Solar Pumpa : केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर वीजनिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच शेतकऱ्यांना देण्याच्या 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने एक लाख पंप बसविण्याचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
राज्यात ११ डिसेंबरपर्यंत एकूण १ लाख १ हजार ४६२ सौर कृषिपंप महावितरणकडून बसविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ९४० पंप जालना जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत. बीड (१४,७०५ पंप), परभणी (९,३३४ पंप), अहिल्यानगर (७,६३० पंप), छत्रपती संभाजीनगर (६,२६७ पंप) आणि हिंगोली (६,०१४ पंप) जिल्ह्यांमध्ये जालन्याच्या खालोखाल पंप बसविण्यात आले आहेत.
राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषिपंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दहा लाखांपेक्षा जास्त पंप बसविण्यात येणार असल्याने कृषी पंपासाठी पैसे भरून वीज कनेक्शनची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणार आहे.
९० ते ९५ टक्के अनुदान
या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून ३० टक्के, तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.