भुसावळ : शहरात सौर उर्जेचा वापर हळूहळू पण सातत्याने वाढत असून, वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर ही बाब शहरासाठी दिलासादायक ठरत आहे. शहरात वीज वितरण कंपनीचे सुमारे ५२ हजार ग्राहक असून, त्यापैकी ४ हजार ४८४ घरांवर सध्या सोलर यंत्रणा कार्यरत आहे. सोलरच्या माध्यमातून दरमहा सुमारे १ एमयु (मिलियन युनिट) वीज निर्मिती होत असून, त्यामुळे मुख्य वीजपुरवठ्यावरचा ताण काही प्रमाणात कमी होत आहे.
भुसावळ शहराला सध्या दर महिन्याला सरासरी ८.२ एमयु विजेची आवश्यकता भासते. मात्र, उन्हाळा तीव्र झाल्यानंतर १५ मार्चनंतर हीच मागणी महिन्याला सुमारे १५ एमयुपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वीज वापरात मोठी वाढ होत असल्याने, सोलर ऊर्जेसारखे पर्यायी स्रोत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
१९२ व्यावसायिक ग्राहकांकडे आहे सोलर प्रकल्प
१) भुसावळ शहरात व्यावसायिक विजेचा वापर करणारे ४ हजार ७०४ ग्राहक असून, त्यांना दरमहा सुमारे ६ लाख ४३ हजार ९३४ युनिट वीज लागते. यासाठी एकूण सुमारे १ कोटी ५६ लाख ९०४ रुपयांचा खर्च करावा लागतो.
२) यापैकी २९ व्यावसायिक ग्राहकांनी सोलर प्लांट बसवले असून, त्यांच्या माध्यमातून दरमहा सुमारे २५ हजार ७१२ युनिट वीज निर्मिती होत आहे.
३) या ग्राहकांना दरमहा सुमारे ४ लाख ९१ हजार १०७ रुपयांची थेट आर्थिक बचत होत आहे.
आठ टक्के ग्राहकांकडे सोलर प्रकल्प बसवण्यात आले आहेत गेल्या दोन महिन्यात यात मोठी वाढ दिसून येत आहे. सोलर ऊर्जेमुळे वीज बिलातील बचत, पर्यावरणपूरक वीज निर्मिती आणि दीर्घकालीन खर्चात होणारी घट यामुळे नागरिकांचा कल या पर्यायाकडे वाढत आहे. सध्या सोलरचा वापर मर्यादित असला, तरी वाढती संख्या आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता भुसावळ शहर ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
दरमहा ४० ग्राहकांकडे सोलर प्रकल्प
शहरात सोलर वापरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सध्या सुमारे आठ टक्के असले, तरी गेल्या दोन महिन्यांत या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत आहे. अलीकडच्या काळात दर महिन्याला सुमारे ४० ते ५० नवीन सोलर यंत्रणा बसवण्यात येत असून, नागरिक आणि व्यावसायिक दोघांकडूनही सोलर ऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे आगामी काळात सोलरद्वारे होणारी वीज निर्मिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात सोलर ऊर्जेचा अधिक वापर झाल्यास, वाढत्या वीज मागणीला सामोरे जाणे सोपे होणार असून, शहराच्या वीज व्यवस्थापनाला स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे
शहरातील दुकाने व व्यावसायिकांचा वीज वापर प्रामुख्याने दिवसा होत असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोलर यंत्रणा बसवल्यास त्याचा थेट आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच ज्यांचा वीज वापर अधिक आहे, अशा ग्राहकांनी सोलर यंत्रणा स्वीकारून स्वतःची वीज बचत साधावी आणि देशाच्या ऊर्जा निर्मितीत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.
- नितीन पाटील, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, भुसावळ
