Join us
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यात केळीचे क्षेत्र दुप्पट वाढल्याने लागवड क्षेत्रावर प्रश्नचिन्ह; कृषी आयुक्तालयाचे पथक करणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 17:27 IST

Banana Crop Insurance : हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत यंदा केळीच्या पीक विम्याची नोंदणी विक्रमी झाली आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक थेट शेतातील बांधावर जाऊन केळी लागवडीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

अजय पाटील

हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यात यंदा केळीच्या पीक विम्याची नोंदणी विक्रमी झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत तब्बल ९९ हजार ४० शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. ज्यामुळे केळीचे १ लाख ३ हजार हेक्टर क्षेत्र पीक विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे.

जळगावमधील केळीचे लागवड क्षेत्र ६० ते ७० हजार हेक्टरपर्यंत मर्यादित होते. गेल्या चार वर्षात हे क्षेत्र दुप्पट वाढल्याने कृषी आयुक्तालयाने संशय व्यक्त केला आहे.

त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक जळगाव जिल्ह्यात दाखल झाले असून, थेट शेतातील बांधावर जाऊन केळी लागवडीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाच्या माहितीनुसार जास्तीत जास्त ८० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत केळीची लागवड होऊ शकते.

बोगस विमाधारकांचा जुना इतिहास

• २०२४ मध्ये ७६ हजार हेक्टरवर पीक विमा काढल्यानंतर कृषी विभागाने पडताळणी केली होती. २ ते ३ हजार शेतकऱ्यांनी लागवड नसतानाही विमा काढल्याचे स्पष्ट झाले होते.

• ३ हजार शेतकऱ्यांनी कारवाईच्या भीतीने पडताळणीच केली नाही आणि १ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी नियमापेक्षा अधिक क्षेत्राचा विमा काढल्याचे आढळले होते.

• २०२२-२३ मध्ये तब्बल १९ हजार शेतकरी बोगस आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने पुन्हा एकदा पडताळणीला सुरुवात केली आहे.

केळी पीक विमा काढलेले शेतकरी

वर्ष शेतकरी संख्या 
२०२२ ८३ हजार 
२०२३ ५८ हजार 
२०२४ ७६ हजार 
२०२५ ९९ हजार 

यंदाची स्थिती...

• एकूण ९९ हजार ४० शेतकऱ्यांनी केळी पीक विमा काढला आहे.

• बिगर कर्जदार ७२ हजार ५१२ शेतकरी आहेत.

•२६ हजार ५२८ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

• जळगाव जिल्ह्यात १ लाख ३ हजार ३८० हेक्टर केळीचे क्षेत्र पीक विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे.

• जळगाव जिल्ह्यातील ११० महसूल मंडळांपैकी ९९ महसूल मंडळात केळीचा विमा काढण्यात आला आहे.

विमा काढण्यात वाढ होण्याची कारणे

• मोठी नुकसानभरपाई : केळी पीक विम्यांतर्गत यंदा ४०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांनी विम्याकडे जास्त कल दाखवला.

• पाण्याची मुबलकता : जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता वाढल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा : डाळिंबवाल्या अशोकरावांना मोसंबीची गोडी; विना मशागत तंत्राने बागेत अर्धा-अर्धा किलो फळांची जोडी

English
हिंदी सारांश
Web Title : Banana crop insurance area doubles in Jalgaon; verification underway.

Web Summary : Jalgaon sees record banana crop insurance, raising suspicions of inflated acreage. An investigation is underway due to a history of fraudulent claims, with officials verifying field data. Increased compensation and water availability are cited as potential reasons for the surge in insurance applications.
टॅग्स :केळीशेती क्षेत्रशेतकरीशेतीपीक विमाफळेफलोत्पादनजळगाव