Join us

Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:25 IST

Pik Vima Yojana अलीकडे राज्यात संततधार व अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केले होते.

अरुण बारसकरसोलापूर : उभे पीक असताना व पीक काढणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना यापुढे पीक विम्याची नुकसानभरपाई मिळणार नाही तर पीक कापणी प्रयोगावर अवलंबून विमा कंपनी नुकसानभरपाई देणार आहे.

अलीकडे राज्यात संततधार व अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केले होते.

मात्र पुन्हा शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईसाठी जुनेच निकष लावले जाणार आहेत. राज्य शासनाच्या बैठकीच्या इतिवृत्तात ही बाब समोर आली आहे.

अलीकडच्या काही वर्षात निसर्ग लहरीत फार बदल झाला आहे. कडक उन्हाळ्यात मध्येच आभाळ येते व पाऊसही पडतो. पावसाळ्यात ढगफुटीसारखा धो-धो, अतिवृष्टी व संततधार पाऊस पडतो. त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होते. हे प्रमाण वाढले आहे.

पावसाळ्यात व कधीही पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिके पाण्यात जातात व धान्य खराब होते. पीक काढून ठेवले त पावसाने गाठले तरीही धान खराब होते. सध्या अतिवृष्टी व संततधार पावसाने झालेल्या पीक नुकसानीची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून दिली जाते.

मात्र शासनाने या दोन्हीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर पीक विम्यापोटी नुकसानभरपाई द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक नुकसानभरपाई विमा कंपनीला द्यावी लागणार आहे.

केंद्र सरकारचे पीक कापणी प्रयोगावर पीक नुकसानभरपाई देण्याचे निकष आहेत, मात्र राज्य शासनाने प्रतिकूल घटकामुळे पेरणी न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, काढणी पश्चाच नुकसान व स्थानिक नैसर्गिक आपत्ती, या चार बाबींचा समावेश केला होता.

२०१६-१७ ते २९२३-२४ या आठ वर्षांत विमा कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटी रुपये हप्ता राज्य शासनाकडून दिला असून, शेतकऱ्यांना ३२ हजार ६५८ कोटी रुपये नुकसानभरपाई दिली आहे. विमा कंपन्यांना १० हजार ५४३ कोटी नफा झाला आहे.

एक रुपयाचा पीक विमा बंदशेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेल्या एक रुपयात पीक विमा ही योजना गुंडाळून केंद्राच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या विम्याची रक्कम भरावी लागणार आहे. एक रुपयात पीक विमा भरायचा असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लाखांच्या पटीत वाढली होती. मात्र, आता रक्कम भरावी लागणार असल्याने विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपोआप घटणार आहे. एक रुपयात पीक विमा योजनेमुळे बोगसगिरी वाढली होती ती नव्या निकषामुळे कमी होईल.

अधिक वाचा: Pik Vima : या जिल्ह्यातील पिक विम्याचे पैसे आले, पुढील आठवड्यात जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर

टॅग्स :पीक विमापीकराज्य सरकारकेंद्र सरकारशेतकरीशेतीपाऊसगारपीटकाढणीखरीपकृषी योजना