श्रीपूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊसबिल अदा केला आहे.
प्रति मे.टन ३ हजारांप्रमाणे तब्बल २८२ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. विशेष म्हणजे एफआरपी २,८५३ रुपये असताना त्यापेक्षा अधिक दर दिला आहे.
कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी ही माहिती दिली. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.
शेतकऱ्यांबरोबरच कारखान्यातील कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ करारानुसार १० टक्के पगारवाढ डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.
विक्रमी गाळप व उत्पादन कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याने १०२ दिवस अखंड गाळप करत ९ लाख ४० हजार २२२ मे.टन उसाचे गाळप केले.
त्यातून ८ लाख ५२ हजार ७९० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११ टक्के राहिला आहे. दैनंदिन गाळपात ही उच्चांक नोंदविण्यात आला आहे.
वीज निर्मिती व आसवनी प्रकल्पाची कामगिरी◼️ को-जनरेशन प्रकल्पातून ६ कोटी युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.◼️ त्यापैकी ३.०४ कोटी युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास विक्री करण्यात आली आहे.◼️ तसेच आसवनी प्रकल्पातून १.१० कोटी लिटर उत्पादन घेण्यात आले असून दोन्ही प्रकल्प सध्या सुरू आहेत.