राज्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशाप्रकारे दिली गेली, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल.
दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजपैकी साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांसाठी आजवरचे सर्वात मोठे पॅकेज असल्याचा दावा पवार यांनी केला. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही दिली आहे.
अतिवृष्टीसंदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याचे शाह यांनी सांगितले आहे.
या अहवालात पिकांचे झालेले नुकसान जनावरे, तसेच जीवितहानी, रस्ते, पूल, विहिरी याचे झालेले नुकसान याचा एकत्रित ताळेबंद दिला जाणार आहे. केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल व त्याचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर मदत राज्याला मिळेल, असेही पवार म्हणाले.
ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल का याबाबत पवार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना ही मदत दिवाळीपूर्वी देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचे सांगितले.
अधिक वाचा: लागवडीखालील क्षेत्र व नुकसानीच्या आकडेवारीचा ताळमेळ बसेना; शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?