महेश घोलप
वर्षभर शेतात राबराब राबायचे. थंडी, उन्हाची, विंचूकाट्याची तमा न बाळगता रात्रीचा दिवस करून कष्ट करायचे. निसर्गाने साथ दिली तर चांगले उत्पन्न घ्यायचे, निसर्गाने अवकृपा केली तर आर्थिक भुर्दंड सोसायचा, निसर्ग साथ देत नाही व शासनही जवळ करत नाही, मग शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले खरे, पण शेतकरी व शेती व्यवसायाला 'अच्छे दिन' कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे आताच्या सर्वच पिकांच्या बाजारभावामुळे दिसते.
सध्या कांदा, सोयाबीन, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, चवळी, मिरची, फुले यांना बाजारभावात अनियमित भाव असल्याने शेतकरी निराश झाला आहे. शेती करावी की नाही? असा प्रश्न आहे. कारण खत, औषधांची भाववाढ, मजुरीतील वाढ, पेट्रोल-डिझेल भाववाढ, शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंची वाढ सातत्याने पाहायला मिळते.
पण पिकांच्या भाववाढीत सातत्य नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. त्यामुळे सातबारावर कर्जाचा बोजा कायम असल्याने पुढील वर्षाकरिता कर्ज मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांकडून बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे, तरीही कर्ज मिळत नाही.
सध्या सोयाबीन, कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे लागवडीचा व काढणीचा खर्चही निघत नाही. खरीप हंगामातील सुरुवातीपासूनची पीक परिस्थिती पाहता टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, चवळी, मिरची, फुले यांचे यावर्षी चांगले उत्पन्न होईल आणि चागले पैसे येतील, असे वाटले. परंतु, रोगांचा प्रादुर्भाव व अवकाळी पावसामुळे तर आता सतत होत असलेल्या पावसामुळे त्यात घट झाली.
त्यात पिकांचे बाजारभाव घसरले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले. अतोनात खर्च करूनही पुढे शेतीत चांगले उत्पन्न घेण्यासाठी लागवडीला पैसाच राहात नाही. वर्षभराचा कुटुंबाचा खर्च शेतीच्या उत्पन्नातून भागत नाही. शेतमाल वगळता रासायनिक खते, कीटकनाशकांसह इतर वस्तूंचे वाढते भावही शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडवत असल्याचे दिसत आहे. शासनाने शेती व्यवसायाला व शेतकऱ्याला उभारी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू
सातबारावर कर्जाचा बोजा कायम असल्याने पुढील वर्षाकरिता कर्ज मिळत नाही. त्याकरिता शेतकऱ्यांकडून बँकेचे उंबरठे झिजवणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
बाजारभावाचा ताळेबंद सापडत नसल्याने शेतकरी पुन्हा पुन्हा मोठ्या अडचणीत सापडत आहे. सरकार व आडते शेतकऱ्यांना वेडे बनवत आहेत, अशीच परिस्थिती सध्या आहे. वाढवलेली पिके सोडून देण्याची वेळ बाजारभावाअभावी शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती 'ना घर का ना घाट का', अशी झाली आहे. - उत्तम गाढवे, प्रगतशील शेतकरी, ओतूर.
पिके हातात येताच ऊन, वारा, पाऊस यांचा धोका निर्माण होतो. कधी पीक जाते, नाहीतर बाजारभाव कमी होतो. बाजारभावात वाढ करण्याबाबत शासन प्रयत्न करत नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पिकांच्या भावासाठी निर्णय घेतला पाहिजे. - सोमनाथ ठिकेकर, शेतकरी.