सलीम सय्यद
बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत, ट्रॅक्टर तर स्वप्नातही नाही अशात अवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च, मग कोळपणी करणार कशी? पीक वाढलेच नाही तर जगणार कसं? या गहन प्रश्नावर उत्तर शोधत लातूर जिल्ह्याच्या हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील ७५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतः औताला जुंपत पत्नी मुक्ताबाई यांना सोबत घेऊन मशागत सुरू केली.
राज्यात एकीकडे बळीराजा पंढरीच्या वारीत असताच लातूर जिल्ह्यातील हा शेतकरी पांडुरंगाला साकडं घालत मातीची सेवा करीत आहे. हा त्यांचा संघर्ष केवळ आर्थिक लढा नसून मातीवरील निष्ठेचा जिवंत नमुना आहे.
२० हजारांचे कर्ज काढले... पेरणीसाठी पैसे नसल्याने २० हजार
रुपयांचे कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरली. शेतात विहीर आहे, पण पाऊस नसल्याने पाणी नाही. शेतीसाठी यापूर्वीच सोसायटीचे ४० हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. शेतीमालाला भाव नाही, जगावे कसे? असा प्रश्न शेतकरी अंबादास पवार यांनी उपस्थित केला.