प्रमोद सुकरेकऱ्हाड : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणजे दरवर्षी शेतकऱ्यांना अनुदानावर अवजारे दिली जातात.
गत आर्थिक वर्षात अर्ज केलेल्या, पात्र ठरलेल्या लाभार्थींना पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मात्र संबंधित साईट चालत नसल्याने दिलेल्या मुदतीत त्यांची कागदपत्रे अपलोड न झाल्याने आता अवजारे मिळणार तरी कधी अन् कशी? असा प्रश्न या लाभार्थी शेतकऱ्यांना पडलेला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना छोटे मोठे ट्रॅक्टर, इतर कृषी अवजारे यासाठी अनुदान दिले जाते.
त्यासाठी शेतकऱ्यांच्या कडून अर्ज मागवले जातात. गत आर्थिक वर्षात ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांची अग्रक्रमाने सोडत काढून संबंधित लाभार्थ्यांना मेसेज द्वारे तुमचा अर्ज मंजूर झाला असल्याचे कळविण्यात आले होते.
आता आपण संबंधित अवजाराचे कोटेशन, टेस्ट रिपोर्ट पोर्टलवर अपलोड करा असे सांगितले होते. त्यासाठी २२ ते ३१ मे अशी मुदत दिली होती. पण तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रे मुदतीत अपलोड होऊ शकली नाहीत.
म्हणून ३ जून पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र तरी देखील बहुतांश शेतकऱ्यांची कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत असे खात्रीशीर समजते. तीच अवस्था ठिबक, फळबाग लागवडीसाठी अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्यांचीही आहे.
..त्यामुळे पुढची प्रक्रिया कशी होणार?ज्या लाभार्थ्यांना अनुदान मंजूर झाले आहे त्यांनी अगोदर आपली कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यानंतर अधिकारी त्याला पूर्वसंमती देतात. मग संबंधित शेतकऱ्यांनी सगळे पैसे देऊन ते अवजार किंवा वहान खरेदी करायचे आहे. नंतर शासनाच्या वतीने अधिकारी त्याची पाहणी करतात व नंतर त्याचे अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते. मात्र कागदपत्रेच अपलोड होत असल्याने ही पुढची प्रक्रिया कशी होणार हा खरा प्रश्न आहे.
अजून मुदतवाढ मिळणार का?खरंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २२ ते ३१ मे पर्यंतची मुदत होती. मात्र महाडीबीटी पोर्टलच्या अडचणी लक्षात घेऊन ती मुदत ३ जून पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र तरी देखील बहुतांशी शेतकरी कागदपत्रे अपलोड करू शकलेले नाहीत. त्यामुळे शासन अजून मुदतवाढ देणार का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून केला जात आहे.
ऑफलाइनही माहिती जमा करून घ्यावीशासनाने सर्व प्रकारची कागदपत्रे ऑनलाईनच भरण्यास सांगितले आहे. मात्र तांत्रिक अडचणींचा विचार करून कृषी विभागाने ऑफलाइनही अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली पाहिजे असे मत अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
खरंतर कागदपत्रं अपलोड झाली असती तर लगेच वाहन, अवजारे खरेदी करता आली असती.अनुदान मिळण्यास चार दिवस पुढे मागे झाले असते तरी चालले असते.पण आता शेतातील मशागतीसाठी त्याचा फायदा झाला असता. मात्र आमची खरेदीची तयारी असताना देखील तांत्रिक अडचणीमुळे कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत. परिणामी इतरांच्या अवजाराने कामे करून घ्यावी लागत आहेत आम्हाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे. - सचिन थोरात, शेतकरी, कार्वे, ता.कराड
अधिक वाचा: कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी हंगामानुसार कसे कराल कांदा लागवड नियोजन?