वैभव साळकर
सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळवलेली ऊर्जा. सूर्य हा पृथ्वीवरील प्रमुख नैसर्गिक ऊर्जास्रोत आहे. ऊर्जेची गरज सध्याच्या तुलनेत काही पटीत वाढेल आणि सध्या वीजनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आण्विक ऊर्जा क्षेत्राने दिवसाला एक अशा गतीने अणुभट्ट्या उभारल्या तरी ही गरज पुरी होण्यासारखी नाही. शिवाय जपानमधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जगानेही अणुप्रकल्पांचा फेरविचार करण्यास सुरुवात केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेचा विचार केला असता एका तासात पृथ्वीवर पडणारी सौरऊर्जा ही रूपांतरित केल्यास आपली एका वर्षाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेशी असते, मात्र हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी बऱ्याच संशोधनाची आवश्यकता आहे. अपारंपारिक आणि विशेषतः सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधनावरील निधी तसेच जागरूकता दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्याच्या पारंपारिक ऊर्जास्रोतांचे पर्याय फक्त अजून काही वर्षेच उपलब्ध असणार आहेत. शिवाय त्यांच्या अनेक नकारात्मक बाजूही आहेत. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सौर ऊर्जेशिवाय वायू ऊर्जा, टायडल, जिओथर्मल असे पर्याय आहेत. मात्र, भविष्यकाळातील ऊर्जेची गरज काही अंशीच भागवण्याची क्षमता त्यात आहे. सध्या सौरऊर्जा क्षेत्रातील संशोधन हे मुख्यतः सौर ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जा स्रोतांपेक्षा कमी खर्चिक करण्यासाठी चालू आहे.
देशानेही पुढाकार घेतला!
• जपान, जर्मनी या सौर ऊर्जेतील परंपरागत शिलेदारांसकट अमेरिका शिवाय चीन आणि भारतानेही याबाबत पुढाकार घेतला आहे. सौर ऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत.
• त्यामुळे प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगसारखे इतर ऊर्जा क्षेत्रांशी निगडित वादांचे विषय सौर ऊर्जेपासून मात्र चार हात दूरच आहेत. भारतातही असे प्रकल्प सुरू आहेत. एकंदरीत काय तर सौरऊर्जा ही काळाची गरज बनली आहे.
हेही वाचा : पारंपरिक पिकांना फाटा देत गणेशरावांनी ३५ गुंठे काकडीतून घेतले पावणेदोन लाखांचे उत्पन्न
