Watermelon Seed : बाळापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीतील वाडेगाव गावात टरबूज बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत झालेला करार प्रत्यक्षात अमलात येत नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Watermelon Seed)
बीजोत्पादनासाठी रोपे देण्यात आली असली, तरी करारात नमूद असलेले आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन व शेतातील प्रत्यक्ष मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Watermelon Seed)
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीकडून टरबूज बीजोत्पादनासाठी रोपांची पूर्तता करण्यात आली. मात्र, पुढील मशागत, मल्चिंग, खत व औषध फवारणी, परागीकरण तसेच संपूर्ण पीक व्यवस्थापनाबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप देण्यात आलेले नाही. परिणामी पीक योग्य पद्धतीने वाढत नसून, संपूर्ण बीजोत्पादन धोक्यात आले आहे.(Watermelon Seed)
पीक धोक्यात; मोठ्या नुकसानीची भीती
बीजोत्पादन पिकासाठी वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन अत्यावश्यक असते. मात्र, ते न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवावर पिकाची देखभाल करावी लागत असून, यामुळे उत्पादन दर्जावर आणि अंतिम उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही शेतकऱ्यांच्या मते, या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.
या संदर्भात संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, मार्गदर्शन देण्याऐवजी उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रश्न विचारल्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नसून, शेतकऱ्यांना दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची व्यथा माध्यमांसमोर
या प्रकरणाबाबत शेतकरी नितीन मनोहरराव मानकर, विष्णू मधुकरराव मानकर तसेच बाळापूर येथील मुन्नाभाई यांनी माध्यमांशी बोलताना आपली व्यथा मांडली.
बीजोत्पादन कार्यक्रम अधिकृतरीत्या मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्ष शेतात कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही. विचारणा केली असता उलट शेतकऱ्यांवरच राग काढला जातो. त्यामुळे आमचे पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.- नितीन एम. मानकर, शेतकरी
कृषी विभागाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाने तातडीने लक्ष देऊन संबंधित कंपनीकडून करारातील अटींची अंमलबजावणी करून घ्यावी, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन आणि झालेल्या नुकसानीसाठी योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी वाडेगाव येथील शेतकरी गटाकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, वेळेत उपाययोजना न झाल्यास टरबूज बीजोत्पादन कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार असून, भविष्यात शेतकरी अशा करारांपासून दूर राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा सविस्तर :Fake Maize Seeds : पेरलं-उगवलं… पण दाणा भरलाच नाही; मका पिकात नेमकं काय बिघडलं?
