Vermicompost : जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत चालली असताना, एक नैसर्गिक पर्याय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. तो म्हणजे गांडूळ खत! रासायनिक निविष्ठांच्या अतिवापरामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. (Vermicompost)
अशा वेळी, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ शेतीचा मार्ग म्हणजे गांडूळ खताचा वापर करणे योग्य राहील. (Vermicompost)
वाढत्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचे सेंद्रिय आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे. जमिनीचा पोत बिघडत असून, नैसर्गिक सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो आहे. (Vermicompost)
अशा पार्श्वभूमीवर, गांडूळ खत (Vermicompost) हे पर्यावरणपूरक, नैसर्गिक व परिणामकारक पर्याय ठरत असून, शाश्वत शेतीकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाने गांडूळ खत उत्पादन व संवर्धनावर विशेष भर दिला आहे. डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागप्रमुख डॉ. शेषराव चव्हाण यांच्या पुढाकाराने गांडूळ खत, वर्मीवॉश आणि जिवंत गांडूळ उत्पादन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
गांडूळ खताचे अनेक फायदे
डॉ. शेषराव चव्हाण यांनी सांगितले की, गांडूळ खत वापरल्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, मातीमध्ये हवा खेळती राहते आणि जलधारण क्षमतेत वाढ होते. यामुळे पिकांची मुळे अधिक मजबुतीने जमिनीत खोलवर रुजतात, परिणामी उत्पादनात वाढ होते.
या खताचे काय आहेत फायदे
* गांडुळामुळे जमिनीत हवा खेळते, मुळे इजा न होता पोषण मिळते.
* जमिनीचा सामू (pH) संतुलित राहतो.
* ह्युमस, नत्र, स्फुरद, पालाश यांसारखी अन्नद्रव्ये झाडांना सहज मिळतात.
* मातीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होते, सूक्ष्मजीव टिकून राहतात.
* ओला कचरा व्यवस्थापनासाठी उत्तम मार्ग आहे.
* जमिनीचा कस टिकतो, धूप आणि बाष्पीभवन कमी होते.
प्रकल्प यशस्वीतेकडे
या प्रकल्पात प्रा. डॉ. संजय शेगोकार, राजेश ढगे, रवी पवार आणि प्रदीप बोळे यांचे मोलाचे योगदान असून, कृषी विद्यापीठात प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना गांडूळ खत उत्पादन, वापर आणि त्याच्या आर्थिक फायद्यांविषयी जागरूक केले जात आहे.
शाश्वत शेतीकडे वाटचाल
डॉ. शेषराव चव्हाण यांनी सांगितले की, सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत अत्यंत फायदेशीर असून, यामुळे पिकांची गुणवत्ता, मातीची सुपीकता आणि शेतीतील नफाक्षमता वाढते. शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर करून केवळ उत्पादनच नव्हे तर पर्यावरणाचेही रक्षण करता येईल.
रासायनिक खताच्या अतिरेकाने जमिनीत निर्माण झालेल्या समस्यांना गांडूळ खत हा स्वस्त, नैसर्गिक आणि शाश्वत उपाय ठरू शकतो. अकोल्यातील कृषी विद्यापीठाचा प्रकल्प हा सेंद्रिय शेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.