Unseasonal rain impact on Rabi crops : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. (Unseasonal rain impact on Rabi crops)
खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामाची कामेही या पावसामुळे विस्कळीत झाली आहेत. (Unseasonal rain impact on Rabi crops)
ऑक्टोबर अखेरपर्यंत अपेक्षित क्षेत्रापैकी केवळ २ टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे खरिपानंतर रब्बी हंगामातही शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. (Unseasonal rain impact on Rabi crops)
खरिपात नुकसान, रब्बीत अडथळे
यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ७ लाख ५६ हजार ५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर सोयाबीन आणि १ लाख ९७ हजार ६४३ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती.
परंतु, ऑगस्ट, सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरच्या परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, शेतकऱ्यांना केवळ दोन क्विंटलपर्यंतच उतारा मिळाल्याचे कृषी विभागाचे प्राथमिक अंदाज दर्शवतात.
रब्बी हंगामात फक्त २ टक्केच पेरणी
खरिपातील तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाकडे आशेने पाहत होते. परंतु पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतातील पाणी निचरण्यास उशीर होत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी प्रस्तावित ३ लाख ३२ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रापैकी आजपर्यंत फक्त ६ हजार ६५४ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यापैकीही अनेक ठिकाणी बियाणे सडून गेले असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
| पीक | प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर) | पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) |
|---|---|---|
| हरभरा | २,४२,५१२ | ४,८०७ |
| गहू | ४०,१५० | ६३३ |
| ज्वारी | ३४,४०४ | ८६८ |
| मका | ६,३८१ | १३६ |
लोहा तालुका आघाडीवर
कृषी विभागाच्या माहितीनुसार, लोहा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ३ हजार ८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे. त्यापाठोपाठ किनवट (१,४७३ हेक्टर), मुखेड (५९१ हेक्टर), धर्माबाद (५१८ हेक्टर) आणि देगलूर (४०६ हेक्टर) तालुक्यांमध्ये पेरणी झाल्याचे समजते. तर अर्धापूर, नायगाव, बिलोली, हदगाव, माहूर, हिमायतनगर आणि भोकर या तालुक्यांमध्ये रब्बी कामांमध्ये पिछाडी दिसून येत आहे.
अनेकांच्या शेतात अजूनही साचले पाणी
अवकाळी पावसामुळे गेल्या आठवड्यात नदी-नाले तुडुंब भरले. काही ठिकाणी ओढ्यांना पूर आल्याने शेतात पाणी अजूनही साचले आहे. त्यामुळे मशागत आणि पेरणी दोन्ही ठप्प आहेत.
शेतकऱ्यांचा त्रास एवढा वाढला आहे की, काही ठिकाणी त्यांनी “खरिप गेला, रब्बीही वाहून चालला, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.
शासन मदतीचा पत्ताही नाही
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत खरिपातील नुकसान भरपाई मिळालेली नाही. रब्बी हंगामासाठी बी-बियाणे आणि खतांसाठी अनुदान देण्याची घोषणा झाली असली तरी, ती मदत अजून कागदावरच आहे. त्यामुळे पावसाच्या थैमानात पिके, उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य सर्वच बाबतीत शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.
