Tur Harvesting : खरीप हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा तुरीच्या पिकावर टिकून होत्या. मात्र, यंदा तुरीनेही अपेक्षाभंग केल्याने सारकिन्ही परिसरातील शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Tur Harvesting)
उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, प्रत्यक्ष मिळणारे उत्पादन अत्यल्प आणि त्यातच बाजारभावातील घसरण या त्रिसूत्री संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यंदा मजुरीच्या दरात झालेली मोठी वाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. तूर सोंगणीसाठी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत काम करणाऱ्या दोन मजुरांसाठी तब्बल ७०० रुपये मजुरी द्यावी लागत आहे. (Tur Harvesting)
त्याशिवाय एकरी सोंगणीसाठी १ हजार ते १ हजार ५०० रुपये अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मळणी यंत्राच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून एका क्विंटलसाठी ३५० ते ४०० रुपये, तर काही भागात ५०० रुपये मोजावे लागत आहेत.(Tur Harvesting)
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तूर पिकाकडून उत्पादन भरपाईची अपेक्षा ठेवली होती.
मात्र, अतिवृष्टीचा फटका तूर पिकालाही बसल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. अनेक शेतांमध्ये एकरी अवघे एक ते दोन क्विंटल इतकेच उत्पादन मिळत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर खर्चही निघणार नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
कर्ज काढून शेती, अपेक्षांवर पाणी
परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बँक व खासगी सावकारांकडून कर्ज काढून तुरीची पेरणी केली होती. यंदा उत्पादन चांगले येईल आणि कर्जफेड करता येईल, अशी आशा होती.
मात्र, प्रत्यक्षात उत्पादन घटल्याने आणि बाजारात तुरीच्या दरात अपेक्षित वाढ न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काही शेतकऱ्यांवर कर्जाच्या हप्त्याचा ताण वाढत असून, पुढील हंगामासाठी लागणाऱ्या भांडवलाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
शासनाकडून मदतीची अपेक्षा
उत्पादन खर्च वाढूनही योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत, तुरीच्या दरासाठी हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी आणि मजुरी व मळणी खर्चात सवलत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. अन्यथा शेती करणे अधिकच तोट्याचे ठरेल, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Tur Crop: तुरीचा उतारा कोसळला; काय आहे कारण जाणून घ्या
