Tur Crop Harvesting : कळमनुरी तालुक्यातील वरूड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Tur Crop Harvesting)
अचानक पावसाची शक्यता लक्षात घेता खरीप हंगामातील तुरीच्या काढणीवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Tur Crop Harvesting)
सध्या तुरीचे पीक सोंगणीला आले असून, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकरी घाईघाईने सोंगणी करताना दिसत आहेत.
ढगाळ हवामानामुळे तुरीच्या शेंगांमध्ये ओलावा वाढून पीक काळवंडण्याची तसेच अंकुर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा पाऊस जरी झाला तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर वरूड व परिसरातील अनेक शेतकरी दिवसरात्र मेहनत घेऊन तुरीची सोंगणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकाच वेळी सोंगणी सुरू झाल्याने काही भागात मजुरांची टंचाईही तीव्रतेने जाणवत आहे.
रब्बी पिकांवरही ढगाळ हवामानाचा परिणाम
ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांनाही बसू लागला आहे. हरभरा आणि गहू ही पिके सध्या जोमात असतानाच हवामानातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे.
हरभऱ्यावर अळीचा मोठ्या प्रमाणात हल्ला होत असून, गहू पिकावर खोडअळी व मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
हवामानातील अनिश्चिततेमुळे आधीच खर्चाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कीड व रोग नियंत्रणासाठी वारंवार फवारण्या कराव्या लागत असून, त्याचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यातच मजुरांची टंचाई आणि संभाव्य पावसाचा धोका यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
पेरणीपासूनच ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. धुक्यामुळे हरभऱ्यावर किडीचे आक्रमण वाढले असून, यंदा केलेला खर्च तरी निघेल का, अशी चिंता सतावत आहे.- कोंडजी कदम, शेतकरी
तुरीची काढणी झाली असली तरी पिकावर मर रोग व अळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादन घटले आहे. त्यातच बाजारभाव समाधानकारक नसल्याने तूर विकावी की साठवून ठेवावी, असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे.- भास्कर गावंडे, शेतकरी
हवामानाकडे लक्ष देण्याचे आवाहन
हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता वर्तविली असून, शेतकऱ्यांनी हवामान अंदाजावर लक्ष ठेवून काढणी व साठवणुकीची योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संभाव्य पावसापासून तूर व इतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.
