गडचिरोली : पूर्वी शेतकरी अनेक पिढ्यांपासून नैसर्गिक हवामानाशी जुळवून घेत विविध हंगामांमध्ये निसर्गाशी नाते जपत शेती करत होते. आधुनिक काळात कृषी तंत्रज्ञान विकसित झाल्याने संकरित बियाणे (Sankarit Biyane) बाजारात येऊ लागले. यामुळे अनेक भागांतील शेतकरी पारंपरिक बियाण्यांना (Paramprik Biyane) बगल देत संकरित बियाण्यांचा वापर करू लागले. त्यामुळे पारंपरिक बियाणे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.
शेतकऱ्यांच्या हातात असलेल्या पारंपरिक बियाण्यांची (Tradional Seed) शिदोरी आता दुर्मीळ होत असून, त्यांची जागा संकरित वाणांनी घेतली आहे. पूर्वी खरीप हंगामात लाल लुच्ची, जय श्रीराम, सुवर्णा, गादमाशी, चेन्नूर आदी पारंपरिक बियाण्यांत एक मोठी ताकद होती. त्या बियाण्यांत टिकाऊपणा आणि सातत्य होते. त्यावेळी शेणखताच्या व नैसर्गिक पावसाच्या भरवशावर उत्पादनाची एक विशिष्ट हमी मिळायची. कमी खर्चात उत्पादन होत होते.
पारंपरिक बियाण्यांमध्ये अधिक रोगप्रतिकार क्षमता
आधुनिक काळात शाश्वत शेतीच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन करणे काळाची गरज आहे. यावर्षी मान्सून १२ दिवसांअगोदर येऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले. रविवार, ८ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला. आता शेतकऱ्यांना पहिल्या दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शेवटी उत्पादनाचा दर्जा आणि प्रमाण, यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे उत्पादनवाढीच्या मोहात पडलेल्या शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. या बियाण्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता नैसर्गिकरीत्या तयार झालेली असायची. त्यांना रासायनिक खत व कीटकनाशकांची गरज भासत नव्हती.
या बियाण्यांमधून उत्पादन घेतल्यानंतर पुढील हंगामासाठी बियाणे काढून ठेवता येत होते. त्यामुळे नवीन बियाणे खरेदी करण्याची गरज भासत नव्हती. संकरित बियाण्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता असली तरी ती मर्यादित असते. हवामान बदलल्यानंतर त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.
मित्र कीटक होताहेत नष्ट
खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. शेतात असलेला तण, कचरा अगदी आग लावून जाळून टाकले जात आहे. जरी पूर्वमशागत म्हणून शेतकरी सदर काम करीत असले, तरी यामुळे शेतातील जंतू, खेकडे, गांडूळ, साप आदी जैविक प्राणी नष्ट होत असल्याने पिकांना फटका बसत आहे.