Pune : "शुभमंगल" म्हणत विवाहाच्या बोहल्यावर चढताना केवळ वचनांची देवाणघेवाण न करता, पर्यावरण रक्षणाचा संकल्पही शरद होले व शीतल करांडे या नवविवाहित जोडप्याने केला.
सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि निसर्गाविषयीचे प्रेम दाखवत त्यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी ३० वडाची रोपे सामाजिक संघटनांना भेट दिली. या अनोख्या पर्यावरणपूरक विवाहाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून पर्यावरण वाचले तरच आपण वाचू ही एक खूणगाठ आज मनाशी बांधण्याची गरज आहे. आणि हे पर्यावरण वाचवण्यासाठी पर्यावरण विषयाची जाणीव मनामध्ये असणे गरजेचे असून याच जाणिवेतून काही पर्यावरण प्रेमी आपल्या या आयुष्याच्या अविस्मरणीय प्रसंगी काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतात.
यातीलच कर्जत मधील सर्व सामाजिक संघटनेच्या जुन्या श्रमप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी महिला पत्रकार शितल करांडे आणि शरद होले हे आपल्या विवाहाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी कर्जत येथे गेल्या साडेचार वर्षांपासून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेला ३० वडाची रोपे देऊन विवाहबद्ध झाले आहे.
नववधू असलेल्या शितल करांडे या सर्व सामाजिक संघटनेत काही दिवस पर्यावरणप्रेमी म्हणून कार्यरत होत्या. कोव्हिडच्या कठीण व भयावह परिस्थितीत गायकरवाडी येथील कोव्हिड सेंटर वर जाऊन झुंबा डान्सच्या माध्यमातून अनेक कोव्हिड पेन्शन्टची भिती कमी करण्याचे मोठे काम त्यावेळी केले होते. नंतर पत्रकारितेच्या अभ्यासासाठी त्या पर गावी गेल्याने सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यापासून त्या बाजूला झाल्या होत्या.
शितल यांनी पुण्यात विविध नामांकित माध्यम समूहामध्ये पत्रकारितेचे काम केले. त्यानंतर त्यांनी कृषी क्षेत्रातही काम केले आहे. त्यांचा विवाह कर्जत येथील वकील शरद होले यांच्याशी पार पडला.
परंतु सर्व सामाजिक संघटनेत पर्यावरण विषयीचे झालेले संस्कार न विसरता त्यांनी आपल्या विवाहप्रसंगी सर्व सामाजिक संघटनेच्या या कार्यास ३० वडाची रोपे देऊन आपल्या आयुष्याचा हा प्रसंग पर्यावरण पूरक करण्याचा प्रयत्न केला. या युवा जोडीने केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्व सामाजिक संघटना गेल्या १७०० दिवसांपासून अविरत श्रमदान करत आहे. आमच्या शुभ कार्याची सुरुवात ही सामाजिक कामातून व्हावी अशी इच्छा होती. आपण निसर्गाचे देणे लागतो या भावनेने आम्ही ३० वटवृक्षाची रोपे देऊन हा उपक्रम केला. - शितल करांडे (नववधू)