Soybean Crop Loss : यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अधूनमधून अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके कुजली, शेंगा भरल्या नाहीत आणि सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. (Soybean Crop Loss)
परिणामी शेतकऱ्यांना केवळ उत्पादनातच नव्हे, तर बाजारमूल्यातही फटका बसण्याची शक्यता आहे. (Soybean Crop Loss)
पावसामुळे पिकाची दयनीय अवस्था
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांतील बहुतांश गावांमध्ये पावसाचे पाणी शेतांमध्ये अनेक दिवस साचून राहिले. परिणामी मूळ कुजणे, शेंगा न भरणे, वाफसाचा अभाव आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्या निर्माण झाल्या. काही ठिकाणी सोयाबीन पिक पूर्णपणे उध्वस्त झाले असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
४.३८ लाख हेक्टरवर लागवड; पण पिकाचे नुकसान तीव्र
यंदाच्या खरीप हंगामात बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ४ लाख ३८ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. कमी कालावधीत येणारे आणि कमी खर्चिक असल्याने हे पीक शेतकऱ्यांचा 'विश्वासाचा आधार' ठरले होते. मात्र सलग तिसऱ्या वर्षी अनियमित पावसामुळे आणि आर्द्र हवामानामुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
दर्जाहानीमुळे बाजारात दरही घसरले
पिकाचा दर्जा घटल्याने बाजारात सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नाही. अनेक बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल दर ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान स्थिरावले असून दर्जाहीन मालाला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
शासनाकडे मदतीची अपेक्षा
खामगाव उपविभागात कृषी विभागाने प्राथमिक पाहणी केली असली तरी बहुतांश ठिकाणी पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे. कृषीतज्ज्ञांनी भविष्यात टिकाऊ शेती, जलनियोजन आणि रोगनियंत्रण उपाययोजनांवर अधिक भर देण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक ताण
खरीप हंगामावरच जगणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्थकारण डळमळीत झाले आहे. कर्जफेड, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी लागणारे भांडवल आणि घरखर्च या सर्व गोष्टींचा ताण वाढला आहे. नुकसानभरपाईच आता त्यांचा एकमेव आधार ठरत आहे.
पावसाने पिकाचा चुराडाच केला. सोयाबीनचा दर्जा ढासळला आहे. नुकसान प्रचंड झाल्याने पुढचा हंगाम कसा काढायचा, हीच चिंता आहे. - नाजूक देशमुख, शेतकरी, जलंब
अतिवृष्टीने शेंगा भरल्याच नाहीत. प्रत्येक वर्षी सोयाबीनवरच विसंबून राहतो; पण नुकसानभरपाई मिळाली नाही, तर कर्जाशिवाय पर्याय नाही. - गजानन उगले, शेतकरी, जलंब
अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारकडून तातडीची मदत आणि योग्य नुकसानभरपाईची अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. अन्यथा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जावर अवलंबून राहावे लागणार आहे.