शिवचरण वावळे
ग्रामीण भागात होणार सौर ऊर्जा क्रांती. राज्य शासनाच्या 'सौर ग्राम' स्पर्धेत जालना जिल्ह्यातील २९ गावांची निवड झाली असून, विजेत्या गावाला तब्बल १ कोटींचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेमुळे गावागावात हरित ऊर्जेची चळवळ उभी राहत असून, ग्रामस्थांना सौर अनुदानाचा थेट लाभ मिळणार आहे. (Solar Village)
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'सौर ग्राम स्पर्धा' योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील २९ गावे स्पर्धेसाठी पात्र ठरली असून, या स्पर्धेतून एका गावाची अंतिम निवड होणार आहे. (Solar Village)
विजेत्या गावाला सौर ऊर्जेच्या वापरासाठी विशेष अनुदानासह १ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देणारी आणि ग्रामविकासाला हातभार लावणारी ठरणार आहे. (Solar Village)
पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये स्पर्धा
'सौर ग्राम स्पर्धा' ही राज्य शासनाची योजना असून, पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांसाठीच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणाऱ्या गावाची निवड होणार आहे.
सौर यंत्रणेसाठी प्रोत्साहन
गावातील ग्रामस्थांना सौर ऊर्जा यंत्रणेसाठी अनुदान देण्यात येणार आहे
१ किलोवॅट सोलर सिस्टम : ३०,००० रु.
२ किलोवॅट : ६०,००० रु.
३ किलोवॅट : ७८,००० रु.
प्रत्येक लाभार्थ्यास ग्रामपंचायतीकडून १,००० प्रोत्साहनपर अनुदान
घरकुल लाभार्थ्यांना दुहेरी लाभ
ज्या लाभार्थ्यांना पंचायत समितीकडून घरकुल मंजुरी मिळाली आहे, त्यांना सौर ऊर्जेसाठी ३०,००० आणि महावितरण विभागाकडून अतिरिक्त १५,००० असे एकूण ४५,००० चे अनुदान मिळणार आहे.
१ कोटी रुपयांचे बक्षीस
या स्पर्धेअंतर्गत अंतिम टप्प्यात निवड झालेल्या एका गावाला १ कोटी रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल. या रकमेचा उपयोग गावाच्या ऊर्जाविषयक विकासासाठी केला जाणार आहे.
तालुकानिहाय निवडलेली गावे
भोकरदन तालुक्यातून सर्वाधिक १३ गावे निवडली गेली आहेत.
तालुका | गावे |
---|---|
जालना | देवमूर्ती, नेर, सेवली |
बदनापूर | बदनापूर |
भोकरदन | अन्वा, आव्हाना, धावडा, हसनाबाद, जळगाव, पारध, पिंपळगाव, राजूर, वलसांवगी |
जाफराबाद | जाफराबाद, टेंभुर्णी, वरुड (बी.के.) |
अंबड | गोंदी, जामखेड, महाकाल, शहागड |
घनसावंगी | घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, रांजणी, तीर्थपुरी |
परतूर | आष्टी, सातोना, वाटूर |
मंठा | मंठा शहर, तळणी |
योजनेचे उद्दिष्ट काय ?
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावागावांत स्वयंपूर्ण ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जेचा प्रसार, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्रामस्थांमध्ये ऊर्जा साक्षरता वाढवणे.
शेतकऱ्यांना वेळेवर वीज उपलब्ध व्हावे.
सौर ग्राम स्पर्धेमुळे गावांना स्वयंपूर्ण ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करता येणार आहे. ही योजना केवळ पर्यावरणपूरकच नव्हे तर ग्रामविकासात आर्थिकदृष्ट्याही मोठा बदल घडवणार आहे. - संजय सगर, अधीक्षक अभियंता, महावितरण, जालना