Solar Pumps : शेतीसाठी दिलासा देणाऱ्या 'सौर कृषीपंप' योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखोंचा हिस्सा भरला… पण प्रत्यक्षात त्यांना काही मिळाले नाही. महिनोमहिने प्रतीक्षा, कार्यालयाचे फेरे आणि कोटेशन बंद… यामुळे शेतकरी पुन्हा एकदा काळजीत पडले आहे. (Solar Pumps)
शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज मिळावी या हेतूने शासनाने सुरू केलेली 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजना सध्या शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (Solar Pumps)
लाभार्थी हिस्सा भरूनही अनेक शेतकऱ्यांना सहा महिन्यांपासून सौर पंप मिळालेला नाही. त्यातच कृषी पंपासाठीचे वीज कोटेशन बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहेत. (Solar Pumps)
कुसुम योजनेतंर्गत जिल्ह्यात जवळपास ११ हजारांवर सौर कृषीपंप बसविण्यात आल्याचा दावा यंत्रणेकडून करण्यात येतो. जून ते डिसेंबरदरम्यान पाणीपातळी बऱ्यापैकी वर असते.
परंतु, या काळात ढगाळ वातावरण असते. त्यामुळे सौरपंपाचा उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर डिसेंबरनंतर पाणीपातळी खालावते. अशा परिस्थितीत बोअरमधून २०० ते ३०० फुटांखालील पाणी ओढत नाही. त्यामुळे वीज कोटेशन सुरू करण्याची मागणी होत आहे.
महिनोमहिने प्रतीक्षा, कार्यालयीन फेऱ्या सुरूच
* हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत आवश्यक रक्कम भरून अर्ज सादर केले आहेत. मात्र, सौर पंप न मिळाल्यामुळे त्यांना वारंवार महावितरण कार्यालयांचे फेऱ्या माराव्या लागत आहेत.
* कोटेशन बंद असल्याने वीज जोडणीही मिळत नाही, त्यामुळे शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनंतरही शेतीसिंचन करू शकत नाहीत.
पुरवठादारांकडील साठा संपला
अनेक शेतकऱ्यांनी अर्ज अपलोड करून आपली रक्कम भरली आहे, परंतु संकेतस्थळावर सतत 'पुरवठादारांकडील साठा संपला' असा संदेश दिसतो आहे.
यामुळे हजारो शेतकरी मानसिक तणावात असून, त्यांना शेतीच्या नियोजनात अडथळे येत आहेत.
ढगाळ हवामानात सौर पंप निष्क्रिय
* शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसाळा व हिवाळ्याच्या काळात वातावरण ढगाळ असते आणि अशा वेळी सौर कृषीपंप कार्यरत राहत नाहीत. दुसरीकडे, वीज कोटेशनही बंद असल्याने शेतीसाठी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही.
* यामुळे शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून पैसे भरले, पण शेती करता येईना अशी अवस्था निर्माण झाली आहे.
आकडेवारी काय सांगते
* हिंगोली जिल्ह्यात जवळपास ५ हजारापेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले आहेत, त्यापैकी केवळ ३४५ सौर पंपच बसविण्यात आले आहेत. उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.
कोटेशन पुन्हा सुरू करा
शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, कृषी पंपासाठीचे कोटेशन पूर्वीप्रमाणे सुरू करावे. तसेच, सौर पंपाचा साठा कधी उपलब्ध होणार याविषयी स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे.
लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.
पैसे भरल्यानंतरही सौर पंप मिळत नाही. कोटेशनही बंद. शेतीसाठी पाणी आहे, पण वापरता येत नाही. आम्ही दाद कुणाकडे मागायची, असा सवाल शेतकरी करत आहेत.
'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजना सुरू असली तरी अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोटेशन पुन्हा सुरू करणे, सौर पंपाचा साठा उपलब्ध करणे गरजेचे आहे.