Soil Health Management : शेती मशागतीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या रोटाव्हेटर यंत्रामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून, पिकांच्या उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.(Soil Health Management)
वरवर जमीन भुसभुशीत दिसत असली तरी १५ ते २० सेंटीमीटरखाली कडक थर तयार होत असून, त्यामुळे पाण्याचा निचरा आणि मुळांची वाढ बाधित होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादनात घट आणि वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.(Soil Health Management)
वर भुसभुशीत, खाली दगडासारखी जमीन
रोटाव्हेटरने नांगरणी केल्यानंतर जमिनीचा वरचा थर सैल आणि भुसभुशीत होतो. मात्र, त्याखालील १५–२० सेंटीमीटरचा थर अत्यंत कडक बनतो.
या कडक थरामुळे पाणी जमिनीत झिरपत नाही आणि पिकांच्या मुळांना खोलवर वाढता येत नाही. यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनावर थेट परिणाम होतो.
उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत घट
कृषी तज्ज्ञांच्या मते, मुळांची वाढ मर्यादित राहिल्याने पिकांचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटू शकते. हा परिणाम वाशिमसह राज्यातील अनेक भागांत दिसून येत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
सिंचन खर्च वाढतोय
जमिनीच्या खालचा थर कडक झाल्यामुळे पाणी खाली झिरपत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार पाणी द्यावे लागते. परिणामी सिंचनाचा खर्च वाढतो आणि शेती अधिक खर्चिक बनते.
मुळे कुजणे, पोषणाचा अभाव
पावसाळ्यात किंवा जास्त पाणी दिल्यास पाणी वरच साचते. त्यामुळे पिकांची मुळे कुजण्याचा धोका वाढतो. तसेच जमिनीतील खोल थरातील झिंक, फॉस्फरस, लोह यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे पिकांना मिळत नाहीत. त्यामुळे पिके कुपोषित राहतात आणि उत्पादनाची गुणवत्ता घटते.
संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष
दक्षिण आशियातील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था 'बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ एशिया (बिसा)' यांनी १५ वर्षांच्या अभ्यासातून रोटाव्हेटरच्या अतिवापराचे दुष्परिणाम स्पष्ट केले आहेत. हा परिणाम केवळ वाशिमपुरता मर्यादित नसून देशातील इतर भागांतही दिसून येत आहे.
मानवी आरोग्यावरही परिणाम
जमिनीतील पोषक तत्त्वांची कमतरता पिकांवर परिणाम करते आणि अशा पिकांमधून मानवाला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने हा प्रश्न केवळ शेतीपुरता न राहता आरोग्याशीही संबंधित ठरत आहे.
उपाय काय?
कृषी तज्ज्ञांनी 'शून्य मशागत' (Zero Tillage) हा पर्याय सुचवला आहे.
थेट पेरणी : नांगरणी न करता यंत्राद्वारे थेट बियाणे पेरणे
गांडुळांची वाढ : नैसर्गिकरीत्या जमिनीची मशागत सुधारते
सेंद्रिय कर्ब वाढ : जमिनीची पाणी धारण क्षमता सुधारते
मशागतीच्या पद्धतीत बदल करावा
रोटाव्हेटरच्या अतिवापरामुळे जमिनी कडक होत आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीच्या पद्धतीत बदल करणे ही काळाची गरज आहे.- संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी
रोटाव्हेटरचा वापर सोयीचा असला तरी त्याचा अतिरेक शेतीसाठी घातक ठरत आहे. दीर्घकालीन उत्पादन टिकवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक बनले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Dairy Farming : दुग्ध उत्पादकांचे गणित बिघडले; खर्च वाढला, हातात काहीच नाही!
अधिक वाचा : Jamin Kharedi : जमीन खरेदीत एक चूक करेल मोठं नुकसान; जाणून घ्या कायदा काय सांगतो
