Soil Fertility Problem : राज्यातील शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर झपाट्याने वाढत असून यामुळे कृषी तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.(Soil Fertility Problem)
उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करीत असले तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.(Soil Fertility Problem)
गेल्या चार वर्षांत प्रति हेक्टरी खतांच्या वापरात मोठी वाढ झाली असून जमिनीचा नैसर्गिक पोत बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.(Soil Fertility Problem)
राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार सन २०२२-२३ मध्ये राज्यात प्रति हेक्टरी सरासरी १०५ किलोग्रॅम रासायनिक खतांचा वापर होत होता.
मात्र त्यानंतर दरवर्षी ही मात्रा सातत्याने वाढत गेली. सन २०२३-२४ मध्ये ११५ किलो, २०२४-२५ मध्ये १२० किलो, तर २०२५-२६ मध्ये ती थेट १४१ किलो प्रति हेक्टरी इतकी झाली आहे. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत प्रति हेक्टरी सुमारे ३६ किलोग्रॅमची वाढ झाली आहे.
उत्पादनवाढीच्या स्पर्धेत वाढला वापर
हरितक्रांतीनंतर रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे शेती उत्पादनात मोठी वाढ झाली. मात्र गेल्या काही वर्षांत अधिक उत्पादन घेण्याच्या स्पर्धेत अनेक शेतकरी रासायनिक खतांचा प्रमाणाबाहेर वापर करीत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
संतुलित खत व्यवस्थापनाऐवजी जास्त खत टाकल्यास उत्पादन वाढेल, असा समज शेतकऱ्यांमध्ये असल्याने खतांचा वापर वाढत असल्याचेही दिसून येते.
हेक्टरी खतांचा वापर किती असावा?
कृषी तज्ज्ञांच्या मते, जमिनीच्या प्रकारानुसार प्रति हेक्टरी ९० ते १०० किलोग्रॅम इतका रासायनिक खतांचा वापर संतुलित मानला जातो.
यापेक्षा अधिक प्रमाणात खतांचा वापर केल्यास जमिनीच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
अतिरेकी वापराचे दुष्परिणाम
रासायनिक खतांचा अतिरेक झाल्यास जमिनीवर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत बिघडतो, मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते, तसेच सेंद्रिय कार्बन घटतो.
याशिवाय जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता कमी होते आणि जमिनीची आम्लता किंवा क्षारता वाढण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी दीर्घकालीन दृष्टीने उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
संतुलित खत व्यवस्थापनाची गरज
कृषी तज्ज्ञांच्या मते, रासायनिक खतांचा अतिरेक टाळण्यासाठी माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच हिरवळीचे खत, शेणखत आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल.
उत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने अनेक शेतकरी रासायनिक खतांचा जादा वापर करतात. मात्र दीर्घकाळ असे केल्यास जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन स्वीकारणे गरजेचे आहे.- सुभाष नानवटे, कृषितज्ज्ञ
अधिक वाचा : Dhan Kharedi : धान खरेदीवरून वाद; सर्वाधिक उत्पादन असलेल्या तालुक्यांना सापत्न वागणूक?
