बापू सोळुंके
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि कृषीमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. (SMART Project)
या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत २२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध उद्योगप्रकल्प उभारले आहेत. त्यापैकी पशुखाद्य निर्मितीच्या प्रकल्पांना सर्वाधिक पसंती मिळाल्याचे चित्र आहे.(SMART Project)
जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यात २०२२ ते २०२७ या कालावधीत हा 'स्मार्ट' प्रकल्प राबविला जात आहे.(SMART Project)
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून त्यास अधिक बाजारमूल्य मिळावे, तसेच शेतकऱ्यांना थेट उद्योगाशी जोडण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.(SMART Project)
६० टक्क्यांपर्यंत अनुदान
स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते.
कडधान्य, अन्नधान्य प्रक्रिया किंवा पल्स उद्योगासाठी सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाते. तर फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांपर्यंतचा प्रकल्प खर्च मंजूर केला जातो.
उर्वरित रक्कम कंपन्या स्वनिधीतून किंवा राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज स्वरूपात उभारतात. जिल्ह्यातील २२ पैकी १० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विविध बँकांकडून कर्ज घेऊन प्रकल्प उभारले आहेत, तर १२ कंपन्या स्वनिधीतून उद्योग साकारत आहे.- अनिल साळुंके, समन्वयक
कोणते प्रकल्प राबविले जात आहेत?
८ शेतकरी कंपन्यांनी कडधान्य व धान्य ग्रेडिंग (प्रतवारी) आणि साठवणुकीसाठी गोदाम उभारणीचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
९ कंपन्या मक्यावर प्रक्रिया करून पशुखाद्य व पोल्ट्री खाद्य निर्मितीचे प्रकल्प राबवत आहेत.
पैठण तालुक्यातील आपेगाव येथे एका शेतकरी उत्पादक कंपनीने आंबा, पेरू आणि सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारला आहे.
पशुखाद्य प्रकल्पांना जास्त मागणी
जिल्ह्यातील बहुतांश भागात मका उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे मक्यापासून पशुखाद्य व पोल्ट्री खाद्य तयार करण्याचे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पशुपालन आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता या प्रकल्पांना अधिक प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला स्थानिक पातळीवरच प्रक्रिया करून अधिक दर मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होत असून कृषी व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप मिळत आहे.
'स्मार्ट' प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या स्वावलंबनाकडे वाटचाल करत असून पुढील काळात आणखी उद्योग उभारणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
