Agriculture News : 'मी कृषिमंत्री असलो तरी याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्रीच घेणार असल्याचे वक्तव्य कृषिमंत्री कोकाटे यांनी केले. शिवाय कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता? असा उलट सवाल देखील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांना केला. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश भागात अवकाळी पावसाने नुकसान केले. या पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, कर्जमाफीसारखी सध्या तरी राज्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करा, असं ते अजित पवार म्हणाले होते. आता कर्जमाफीबाबत बोलताना कृषी मंत्री म्हणाले की, 'तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात, त्याचे तुम्ही काय करता? त्या पैशांची शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आहे आता तुम्हाला. शेतीच्या पाईपलाईनसाठी, सिंचनासाठी पैसे मिळतात, असंही ते म्हणाले.
सरकारच्या धोरणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे. सरकार मतांच्या राजकारणासाठी शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत असल्याने शेतीतील तोटा वाढतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे हंगाम उभा करण्यासाठी सातत्याने कर्ज घ्यावे लागते. प्रत्येक हंगाम तोट्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर वाढत राहतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी अशी विधाने टाळून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे.
- डॉ. अजित नवले, किसान सभा
अवकाळीची नुकसान भरपाईबाबत सकारात्मक
नाशिकसह राज्यातील अनेक भागात मागच्या दोन दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला असून, पंचनाम्याचे आदेश संबंधित कृषी विभागाला देण्यात आले आहेत. २४ जिल्ह्यांतील ११० तालुक्यांमध्ये २६ ते २७हजार एकरांवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. पुढच्या चार-पाच दिवसांत आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.