Farmers Shetsara : शेतसारा म्हणजे शेतजमिनीवर शासनाला भरावा लागणारा एक प्रकारचा कर होय. यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शेतसारा भरण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांकडे तगादा लावला जात आहे. शेतसारा भरायला हवा का, नाही भरल्यास त्याचे काय परिणाम होतात? हे समजून घेऊयात...
शेतसारा म्हणजे जमिनीवर आकारला जाणारा महसूल किंवा कर आहे, जो ब्रिटिश काळापासून सुरू आहे. पूर्वी राजाला किंवा शासनाला पैसे किंवा धान्याच्या स्वरूपात द्यावा लागत असे. आता भूमी अभिलेख विभागाने 'ई-चावडी' अंतर्गत शेतसारा ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू केली आहे. यामुळे तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही; शेतकरी घरबसल्या भरू शकतात.
यंदा पावसाने हाहाकार करत शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. अनेकांची शेतीही वाहून गेली. अशा परिस्थितीत जे राहील, त्यालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यातच शेतसारा कुठून भरायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे दुष्काळी परिस्थितीत आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यास शेतसारा माफ होतो, असे असताना अनेक ठिकाणची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक कशी दाखवली गेली, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आता रब्बी हंगामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत आहे.
ओला आणि सुका दुष्काळासंबंधी निकष - वेगळे असतात. दुष्काळातच फक्त - शेतसारा माफ करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात हा शेतसारा माफ होत नाही तर तो पुढच्यावेळी जमा करून घेण्याची तरतूद नियमात आहे आणि हा शेतसारा जास्त नसतो, त्यामुळे शेतकरी बांधव शक्यतो तो टाळत नाहीत.
- सचिन मोरे, प्रभारी सर्कल, नगरदेवळा विभाग
