नाशिक : देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी आता कोबीच्या बियाणे टाकण्यास सुरुवात केली आहे. ज्या काही शेतकऱ्यांनी कोबीचे बियाणे टाकली आहेत, त्यातील उन्हामुळे उगवण क्षमता कमी होत असल्याने, उन्हापासून रोपांचा बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.
कोबीचे बियाणे साधारण मे महिन्यात टाकले जाते, त्यानंतर २१ दिवसांनंतर कोबीचे रूप लागवडी योग्य होते. आता यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊन असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होते. खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी कोबीचे बियाणे टाकण्यास सुरुवात केली आहे. पण उष्णतेमुळे कोबीचे बियाणाची उगवण क्षमता कमी प्रमाणात होत आहे.
जी रोपे जगली आहेत तीदेखील पाहिजे त्या प्रमाणात टवटवीत दिसत नाही. उन्हाची तीव्रता एवढी प्रचंड आहे की सकाळी रोपांना पाणी भरले की सायंकाळी जमीन कोरडी होते. याचा परिणाम कोबीच्या रोपावर होत आहे.
या रोपावर महागडी फवारणी करूनही काही उपयोग होत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून ऐकावयास मिळते. या रोपाचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेडनेट किंवा जुन्या साड्या बांबूवर टाकून सावली म्हणून उपयोग करून कोबी रोपाचा बचाव केला जात आहे.
विक्रेते जबाबदारी घेईना
या उष्ण वातावरणामुळे बियाणे विक्रेता दुकानदार कोबी बियाणे देण्याची जबाबदारी घेत नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारी वर बियाणे घ्या. आमची जबाबदारी नाही असा सल्ला शेतकऱ्याला दुकानदार देत आहे. कोबीचे बियाणे हे महागडे असते. त्यामुळे कोबीचे बियाणे आता टाकावे की नंतर टाकावे हा विचार शेतकरी करीत आहे.
Solar Pump Yojana : सामायिक सातबारा असेल तर सोलर कृषि पंप योजनेचा लाभ मिळू शकतो का? वाचा सविस्तर
