दीपक ढोले
पारंपरिक शेतीवर दुष्काळाचे संकट वाढत असताना जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नव्या पद्धतीचा मार्ग अवलंबत उत्पन्नात मोठी वाढ साधली आहे. (Seed Production Farming)
अवघ्या १० गुंठे क्षेत्रात शेडनेटच्या माध्यमातून बियाणे उत्पादन (सीड शेती) करत जिल्ह्यातील सुमारे ७ हजार शेतकरी अवघ्या पाच महिन्यांत प्रत्येकी २ ते २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. या व्यवसायातून जिल्ह्यात दरवर्षी १५० ते २०० कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. (Seed Production Farming)
जालना जिल्हा स्टील उद्योगासाठी ओळखला जात असला, तरी शेतीतही येथे नवे प्रयोग यशस्वी ठरत आहेत.(Seed Production Farming)
दुष्काळी परिस्थितीमुळे पारंपरिक पिकांवर मर्यादा आल्याने भोकरदन, जालना, बदनापूर आणि जाफराबाद तालुक्यांतील शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादनाचा पर्याय स्वीकारला आहे. जिल्ह्यात सुमारे १५० कंपन्या या क्षेत्रात कार्यरत असून, त्या शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देऊन बियाण्यांचे उत्पादन करून घेतात. (Seed Production Farming)
१० गुंठ्यात शेडनेट; पाच महिन्यांत उत्पन्न
शेतकरी शेडनेट उभारून मिरची, काकडी, टोमॅटो, दोडके, भेंडी, कापूस आणि झेंडू यांसारख्या पिकांचे बियाणे तयार करतात.
या प्रक्रियेत पिकांचे ‘पोलन’ (परागीभवन) हाताने करावे लागते. संपूर्ण प्रक्रिया सुमारे पाच महिन्यांत पूर्ण होते आणि त्यानंतर बियाण्यांची विक्री केली जाते.
महिलांसाठी रोजगाराची मोठी संधी
या सीड शेतीतून जिल्ह्यातील ३० ते ३५ हजार महिलांना रोजगार मिळत आहे. एका पिकाच्या पोलन प्रक्रियेसाठी ५ ते ६ महिलांची आवश्यकता असते. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आहे.
अनुभवातून मिळालेला यशाचा मार्ग
गेल्या १०-१५ वर्षांपासून मी मिरचीच्या शेडनेट शेतीत काम करतो. सुरुवातीला सुमारे एक लाख रुपयांचा खर्च आला; मात्र आता दरवर्षी ३ ते ४ लाख रुपये नफा मिळतो.- हरिभाऊ खरात, बियाणे उत्पादक शेतकरी
कमी जागेत चांगले उत्पन्न मिळावे, या उद्देशाने शेडनेट शेती सुरू केली. आज त्यातून दरवर्षी २ ते २.५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.-नारायण आघाव, शेतकरी
बियाणे उत्पादनातून मोठी अर्थचक्र निर्मिती
जालना जिल्ह्यात दरवर्षी सुमारे २,८०० क्विंटल बियाण्यांचे उत्पादन होते. या व्यवसायामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही, तर स्थानिक स्तरावर मोठे आर्थिक चक्रही तयार झाले आहे.
दुष्काळावर मात करण्याचा यशस्वी प्रयोग
पारंपरिक शेतीतील अनिश्चिततेवर मात करत शेडनेट आणि बियाणे उत्पादन हा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन आणि खात्रीशीर बाजारपेठ मिळाल्याने जालना जिल्हा 'सीड हब' म्हणूनही ओळख निर्माण करत आहे.
अधिक वाचा : NREGA Wage Rate 2026 : नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण
