पुणे : सातबारा उताऱ्यावरील सामाईक क्षेत्र असलेल्या प्रत्येक खातेदाराच्या नावावरील हिश्शाची स्वतंत्र नोंद करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनींच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येणार असून, शेतकऱ्यांनाही योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त खातेदार (सहिस्सेदार) आहेत. खातेफोड न झाल्यामुळे सातबारा उताऱ्यावर सामाईक क्षेत्र दर्शविण्यात आले आहे. अशा सातबारा उताऱ्यातील सामाईक खात्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर त्याच्या हिश्शाची जमिनीची स्वतंत्रपणे नोंद होणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडून अॅग्रिस्टॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे 'शेतकरी ओळख क्रमांक' (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहेत.
त्यासाठी जमिनीचे अचूक क्षेत्र नोंद असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी सातबारा उताऱ्यावर सामाईक खात्यामध्ये एकूण क्षेत्र हे एका खातेदाराच्या नावासमोर नमूद आहे. खातेफोड न झाल्याने शेतकरी ओळख क्रमांक करताना सर्व खातेदारांच्या नावासमोर त्या खात्यातील एकूण क्षेत्र नमूद करावे लागत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.
उताऱ्यावर नेमके किती क्षेत्र आहे याची माहिती होणार
महसूल विभागाच्यावतीने तालुका आणि मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यामध्ये सातबारा उताऱ्यावरील हिस्सेदारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. सामाईक क्षेत्रामुळे सातबारा उताऱ्यावर नेमके कोणाचे किती क्षेत्र आहे, त्यांची हद्द नेमकी कोणती आहे, यासह अनेक गोष्टींत स्पष्टता येणार आहे.
आता फेरफार नोंद करताना उडणार नाही गोंधळ
फेरफार नोंद करताना गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी प्रत्येक हिस्सेदाराचे क्षेत्र त्याच्या नावापुढे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूल विभागाचे सहसचिव बनकर यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
