अरुण चव्हाण
'संत्रा म्हणजे नागपूर' हे समीकरण अनेक दशकांपासून परिचित असले तरी हिंगोली जिल्ह्यातील शिरला (ता. वसमत) येथील प्रगतिशील शेतकरी पांडुरंग कुऱ्हे यांनी मात्र या समजाला नवे परिमाण दिले आहे. (Santra Sheti)
नागपूरच्या शास्त्रज्ञांनाही आता शिरल्याच्या संत्र्यांचा मोह पडला असून, त्यांनी ६ जून रोजी शिरला येथे भेट देऊन बागेची पाहणी केली आणि शास्त्रोक्त मार्गदर्शनही केले. (Santra Sheti)
२० एकरमध्ये २ हजार संत्रा झाडांचे उत्पादन
पांडुरंग कुन्हे यांनी आपल्या २० एकर क्षेत्रात संत्र्याची २ हजार झाडे फुलवली आहेत. ही फळे केवळ स्थानिक नव्हे, तर दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारख्या प्रमुख शहरांतील बाजारपेठेत पाठवली जातात. एका वर्षात २० ते २५ लाख रुपये उत्पन्न मिळते, असा दावा कुन्हे यांनी केला.
नागपूरच्या शास्त्रज्ञांचा दौरा
या बागेची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत पोहोचल्याने, त्यांनी राष्ट्रीय लिंबू संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना या बागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ. थिरू, डॉ. सुरजित मंडल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बागेला भेट दिली.
त्यांनी अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, कीडनाशकांची निवड आणि कीड नियंत्रण पद्धती यासंदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
'मृग बहार'मुळे चव, गोडवा वाढतो
नागपूरमध्ये जिथे संत्र्यांचा खट्टा बहार घेतला जातो, तिथे पांडुरंग कुऱ्हे मात्र 'मृग बहार' घेतात. मार्च-एप्रिल महिन्यात संत्र्यांची चव अधिक गोडसर होते आणि बाजारात चांगला भाव मिळतो.
बाराशे ते सोळाशे रुपये प्रति कॅरेट म्हणजे अंदाजे ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा दर शिरल्याच्या संत्र्यांना मिळतो.
बाजारपेठेची मागणी आणि उत्पन्नाचे गणित
या बागेतील संत्र्यांची क्वालिटी पाहून हाय-एंड बाजारपेठांमधून मागणी वाढली आहे. उच्च तापमान असताना गोडवा अधिक असल्यामुळे दरही वाढतो.
रोपांची लागवड, बागेचे व्यवस्थापन, कीडनियंत्रण अशा सर्व बाबतीत कुऱ्हे यांनी आधुनिक व शास्त्रोक्त तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अनिल ओळंबे, कृषी विस्तार अधिकारी डॉ. अतुल मुराई, आणि शेतकरी गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हानवते, सुंदरराव कुऱ्हे यांची उपस्थिती होती. यामध्ये शेतकऱ्यांनी थेट संवाद साधून आपले प्रश्न मांडले.
नवीन संधी
ही बाग आणि पांडुरंग कुन्हे यांचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी एक यशस्वी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. हिंगोली जिल्ह्यात संत्रा शेतीसाठी संभाव्यता वाढत आहे आणि शासन व शास्त्रज्ञांच्या मदतीने ही शेती आणखी सक्षम होणार आहे.
मृग बहार घेतला जातो
२० एकर क्षेत्रावर संत्र्यांची दोन हजार झाडे लावली आहेत. नागपूरमध्ये संत्र्यांचा खट्टा बहार घेतला जातो. मात्र, आम्ही मृग बहार घेतो. उन्हाळा जेवढा कडक असतो, तेवढा संत्र्यांचा गोडवा वाढतो. मार्च, एप्रिलमध्ये हा बहार येतो. दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद येथील बाजारपेठेत या संत्र्यांना मागणी आहे. - पांडुरंग कुऱ्हे, संत्रा उत्पादक, शिरला