Santra Mrug Bahar : एकीकडे एप्रिल व मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे (Avkali Paus) भरपूर बागामध्ये मृग बहार फुटू शकला नाही. मात्र योग्य नियोजनाच्या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी भारती पोहोरकर यांनी संत्रा मृग बहराचे यशस्वी व्यवस्थापन केले आहे.
अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) चांदूरबाजार तालुक्यातील करंजगाव महसूल मंडळातील खेल चौधर मौजेमध्ये भारती अरुणराव पोहोरकर यांनी एम कॉम शिक्षणासोबत शेतीचा सुद्धा परिपूर्ण अभ्यास केला. अभ्यास करता करता त्यांनी १८० रंगपुरी संत्र्याची कलम लावली. त्यांच्या कुटुंबात भारतीताई आणि आई या दोघींचाच परिवार आहे. भारतीताईंनी पार्ट टाइम अकाउंटचे काम करत असताना सुद्धा शेतीमध्ये काम करायची हयगय केली नाही.
१ एकर ४ गुंठ्यामध्ये त्यांनी संत्र्याची झाड सात वर्षाची मोठी केली. त्या अगोदर त्यांनी शेतीत मिरची, कांदा अशी पिके घेतली. मध्यंतरी एप्रिल-मे मध्ये संत्र्याच्या भरपूर बागा मृग बहारासाठी शेतकऱ्यांनी तानावर सोडल्या होत्या. अशातच एप्रिल व मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भरपूर बागामध्ये मृग बहार फुटू शकला नाही.
पण भारतीताई या अवकाळी पावसामुळे मृग बहार (Santra Mrug Bahar) घेऊन यशस्वी ठरल्या. आज त्यांच्या प्रत्येक झाडावर मृगबहार फुटलेला दिसत आहे. आज त्यांची मृग बहार बाग व त्यांचे झाडाचे नियोजन पाहण्यासाठी शेतकरी भेटीसाठी येत आहेत. शेतीमित्र पुष्पक खापरे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मृग बहार घेण्यास यशस्वी ठरल्याचे ते सांगतात.
आज प्रत्येक महिलेने शेतीत लक्ष देणे ही काळाची गरज आहे. शेतकरी वर्गाला यावर्षीच्या कठीण वातावरणात मृग बहार फोडण्याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्याने शेतीत नैसर्गिक संकटावर मात करता येते.
- भारती अरुणराव पोहोरकर, करजगाव, अमरावती