मोहन बारहाते
काळ्या कसदार जमिनीत, शेताच्या बांधावर आणि माळरानावर आपोआप उगवणाऱ्या रानभाज्या म्हणजे निसर्गाची अनमोल देणगी. (Ranbhaji)
कोणत्याही रासायनिक खतांशिवाय किंवा कीडनाशकांशिवाय उगवणाऱ्या या भाज्या पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध असतात. (Ranbhaji)
मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फास्टफूडच्या वाढत्या आकर्षणामुळे या 'नैसर्गिक सुपरफूड'कडे दुर्लक्ष होत असून त्या हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.(Ranbhaji)
आधुनिकतेचा फटका
ग्रामीण भागात सहज उपलब्ध असलेल्या रानभाज्या शहरांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडत असल्याचे चित्र आहे.
पिझ्झा-बर्गरच्या वाढत्या ट्रेंडमुळे नव्या पिढीला या पारंपरिक चवीचा परिचयही राहिलेला नाही. परिणामी, रानभाज्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे.
आरोग्यासाठी वरदान
आयुर्वेदानुसार रानभाज्या पित्तशामक, रक्तशुद्धी करणाऱ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आहेत. त्या शरीरातील दोषांचे संतुलन राखतात तसेच पचनक्रियेस मदत करतात. त्यामुळे एकूण आरोग्य सुधारण्यास त्यांचा मोठा हातभार लागतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि फायदे
कर्टुली : मधुमेहासाठी गुणकारी, फायबरयुक्त
केंजळ : लोहाचा समृद्ध स्रोत
पाथर (पाथरी) : रक्तशुद्धी व पोटाच्या विकारांवर उपयोगी
माठ : शरीरातील उष्णता कमी करून हाडे मजबूत करतो
तांदूळजा : डोळ्यांसाठी व दाह कमी करण्यासाठी उपयुक्त
कुडू : किडनी स्टोनवर गुणकारी
राजगिरा : कॅल्शिअमचा उत्तम स्रोत
घोळ : ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त, हृदयासाठी फायदेशीर
तरवटा : पचनास मदत, त्वचारोगांवर उपयोगी
उंबर : जुलाब, अतिसार व मूळव्याधावर लाभदायक
तोंडली : शरीरातील उष्णता कमी करते
जपणूक करण्याची गरज
रानभाज्या केवळ अन्न नाहीत, तर त्या ग्रामीण संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहेत. बदलत्या काळात त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या भाज्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा आहारात समावेश करावा, तसेच बाजारपेठेत त्यांना स्थान मिळवून देण्याची गरज आहे.
रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेले ‘सुपरफूड’ असून त्यांचे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता त्यांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा, आधुनिकतेच्या लाटेत ही पारंपरिक संपत्ती कायमची हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chighor Vegetable : 'चिघोर'ची भाजी खाल्लंय का? ही रानभाजी सध्या सुपरहिट!
