Ranbhaji : पावसाळा सुरू झाल्याने जंगलातील रानभाज्या तरारल्या आहेत. वनांमधला रानमेवा, अनेकविध चविष्ट, आरोग्यदायी, औषधी, गुणकारी रानभाज्यांना बहर आला. या भाज्या चवीला रुचकर व औषधी गुणधर्माने पोषणयुक्त असतात. रानभाजी तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
कृषी विभागाच्या नोंदीनुसार, जंगलात व शेतशिवारात रानभाज्या उगवण्याचे क्षेत्र वाढले. पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या व मशागत न करता उगवतात त्यांना 'रानभाज्या' म्हणतात. ज्या भाज्या शेतमळ्यात पिकतात. त्यांना 'शेतभाज्या' म्हणतात. प्रत्येक रानभाजीत औषधी गुणधर्म आहेत.
रानभाज्या वापरताना कोणती काळजी घ्यावी?
रानभाज्यांची शास्त्रीय नावे कठीण आहेत; पण स्थानिक नागरिकांना उत्तम माहिती असते. कोणती भाजी कुठे आढळते, औषधी गुणधर्म कोणते, याबाबत स्थानिक नागरिक, शेतकरी व महिलांना चांगले कळते. रानभाज्यांची स्थानिक नावे कोणती, याविषयीचे त्यांचे ज्ञान फरफेक्ट असते.
त्यामुळे रानभाज्या शक्यतो स्थानिकांकडून घ्याव्यात. त्या स्वच्छ धुव्याव्यात. प्रसंगी उकडाव्यात. शक्यतो तो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यास त्या आरोग्यासाठी हमखास पोषक ठरतात, असा सल्ला तज्ज्ञ व्यक्तींनी दिला.
विविध रानभाज्या
करटोली, दिंडा, टाकळा (तरोटा), कुडा, आंबुशी, पाथरी (पातूर), शेवगा, अळू, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, बांबू, खापरफुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर, गुळवेल, मायाळू, तांदूळजा, कडूभाजी, बहावा, यासारख्या अनेक रानभाज्या पावसाळ्यात विपुल प्रमाणात आढळतात.