अमरावती : रब्बी हंगामात जिल्ह्यात युरिया आणि संयुक्त खतांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली असून, कृषी विभागाच्या नियोजनामुळे सध्या खतांचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.(Rabi Season Fertilizer Use)
ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या हंगामात आतापर्यंत ९३,६९७ मेट्रिक टन खतांचा पुरवठा करण्यात आला असून त्यापैकी ७६,३०८ मेट्रिक टन खतांची विक्री झाली आहे.(Rabi Season Fertilizer Use)
खतांचा साठा समाधानकारक
कृषी विभागाच्या अहवालानुसार, रब्बी हंगामासाठी ९३,४५० मेट्रिक टन खत साठ्याला मंजुरी देण्यात आली होती.
सध्या जिल्ह्यात ६१,२१६ मेट्रिक टन खतांचा साठा शिल्लक असून, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नवीन पुरवठ्यासह सप्टेंबर २०२५ अखेरचा ३७,८२७ मेट्रिक टन जुना साठाही उपलब्ध असल्याने बहुतांश खतांचा तुटवडा जाणवलेला नाही.
युरियाची सर्वाधिक विक्री
रबी हंगामात गहू आणि हरभरा पिकांसाठी युरियाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. जिल्ह्यात ३०,४०९ मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाला असून, त्यापैकी २९,८३५ मेट्रिक टन विक्री झाली आहे. सध्या ८,३९६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे.
संयुक्त खतांचा वाढता वापर
यंदा शेतकऱ्यांचा कल संयुक्त खतांकडेही वाढल्याचे दिसून येत आहे. एकूण ३८,१०१ मेट्रिक टन संयुक्त खतांचा साठा उपलब्ध झाला होता. त्यापैकी २२,०३६ मेट्रिक टन विक्री झाली असून, अजूनही २८,७९६ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे.
डीएपी आणि एसएसपीची मागणी
डीएपी खताचा १२,९७७ मेट्रिक टन पुरवठा झाला असून, ९,००२ मेट्रिक टन विक्री झाली आहे. याशिवाय एसएसपी खताचीही १२,९४२ मेट्रिक टन विक्री झाली आहे.
विविध पिकांच्या गरजेनुसार शेतकरी संतुलित खतांचा वापर करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
तुटवडा नाही, शेतकऱ्यांना दिलासा
यंदाच्या हंगामात युरिया वगळता इतर खतांचा तुटवडा जाणवलेला नाही. जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत आहेत.
कृषी विभागाचे नियोजन यशस्वी
कृषी विभागाच्या योग्य नियोजनामुळे खतांचा पुरवठा आणि वितरण सुरळीत पार पडले असून, रब्बी हंगामात उत्पादन टिकवण्यासाठी ही बाब महत्त्वाची ठरत आहे. आगामी खरीप हंगामासाठीही याच पद्धतीने नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा सविस्तर : Soil Fertility : अन्नच विषारी बनतेय! शेतीतल्या 'या' मोठ्या चुकीमुळे वाढतोय धोका
