नंदुरबार : तालुक्यातील तिलाली येथील शेतकरी मनोज चिंधू पाटील यांनी डाळिंबाची यशस्वी लागवड केली आहे. भाऊसाहेब पांडुरंग फुंडकर योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून त्यांनी २०२३-२४ मध्ये ०.८० हेक्टर क्षेत्रावर उभी केलेली बाग पहिल्या बहरामध्येच सुमारे ७ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले. दुसऱ्या भारचे फळही चांगले आले असून, पुढील १३-१५ वर्षे नियमित उत्पन्न मिळणार आहे.
डाळिंबाचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये विकले जाते आणि त्याला चांगला दर मिळत आहे. सरासरी दर सुमारे ६०-७० रुपये प्रति किलो असून, बाजारभाव जास्त वाढल्यास शेतकऱ्याचे उत्पन्न आणखी वाढू शकते. तसेच योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीतून चांगले आणि शाश्वत उत्पन्न मिळवता येऊ शकते, असेही मनोज पाटील यांनी सांगितले.
योग्य नियोजन, मेहनत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली, तर चांगला फायदा मिळतो. पूर्वी डाळिंबाबरोबर आंतरपीक म्हणून झेंडू व भाजीपाल्यांची लागवड केली जात होती, ज्यामुळे तात्काळ उत्पन्न मिळाले. मात्र, आता ते थांबवण्यात आले आहे.
सहाय्यक कृषी अधिकारी संदेश सूर्यवंशी, उपकृषी अधिकारी सुनील पवार, मंडळ कृषी अधिकारी वैभव कोरडे यांनी मनोज पाटील यांना लागवडीत मार्गदर्शन केले. शेतकऱ्याने नंदुरबार तालुक्याच्या पूर्वभागातील तिलाली गावात अत्यंत कमी पाण्यावर हे पीक अत्यंत नियोजन बद्धरित्या घेतले आहे.
पाण्याचे नियोजन करीत पीक संगोपनावर दिला भर
डाळिंब लागवडीसाठी त्यांना सुमारे १० लाख रुपये खर्च आला. आता पहिल्या बहरातून ७ लाखांचे उत्पन्न निघाले असून दुसऱ्या भाराचे फळही चांगले आहे. जर बाजारभाव १०० रुपयांवर गेला, तर उत्पन्न आणखी वाढेल.
