Pik Karj Vasuli : परतीच्या पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता पीक कर्जाच्या वसुलीचे सावट आले आहे.राष्ट्रीयीकृत बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी नोटिसा बजावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.(Pik Karj Vasuli)
शेतीत मोठे नुकसान झालेल्या परिस्थितीत बँकांकडून वसुलीचा तगादा लावला जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.(Pik Karj Vasuli)
काही महिन्यांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.(Pik Karj Vasuli)
अनेक ठिकाणी पिके पाण्याने वाहून गेली, तर काही ठिकाणी उभ्या सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटल्याने उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.(Pik Karj Vasuli)
अशा परिस्थितीत अद्याप रब्बी हंगामातील पिके हाती आलेली नाहीत. घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आधीच बिकट झाली आहे.(Pik Karj Vasuli)
त्यातच आता राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीक कर्जाची वसुली सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा
येरोळ येथील राष्ट्रीयीकृत बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये १४ मार्च रोजी लातूर येथे होणाऱ्या लोकअदालतीत उपस्थित राहून तडजोडीने कर्जफेड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केवळ नोटिसाच नव्हे तर गावोगावी ऑटोवर लाऊडस्पीकर लावून कर्जफेडीबाबत जाहीर आवाहन केले जात असल्याचेही समोर आले आहे.
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही वसुली?
राज्य सरकारकडून थकबाकीदार शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली होती.
मात्र दुसरीकडे बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
प्रशासनाने हस्तक्षेप करावा
परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर कर्जवसुलीचा दबाव टाकणे अन्यायकारक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
रब्बी हंगामातील उत्पादन हाती येण्यापूर्वीच कर्जवसुली सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
