Partition of Land : लग्न झालेले जोडपे असले की, त्यांच्या मिळकतीचे काय करायचे हे त्यांचे ठरलेले असते. नवरा-बायको आपली मिळकत एकमेकांना / मुलांना/नातवंडांना देतात. स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो..
मात्र, एखादा हिंदू पुरुष आणि महिला जर मृत्युपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे होते. यासाठी कायद्याने क्लास-१-हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते.
हिंदू पुरुष आणि मिळकतीचे विभाजन : एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करता मरण पावल्यास त्याची स्वकष्टार्जित मिळकत हिंदू वारसा कायद्याच्या कलम ८ अन्वये सर्व प्रथम त्याचे क्लास-१ हेअर्स यांना समान हक्काने मिळते, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने त्याची विधवा पत्नी, मुलगा-मुलगी (मुले), आई, जर मुलगा-मुलगी आधीच मृत झाली असल्यास त्यांची मुले (नातवंडे), मुलाची विधवा पत्नी (सून) इ.चा समावेश होतो. जर का क्लास-१ वारसांपैकी कोणीही नसेल, तर मग क्लास-२ वारसांकडे अशी संपत्ती जाते. क्लास-२ हेअर्समध्ये प्रामुख्याने वडील, मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीचा मुलगा किंवा मुलगी (पतवंडे), भाऊ-बहीण, चुलते इ. यांचा समावेश होतो.
हिंदू महिला आणि मिळकतीचे विभाजन : हिंदू वारसा कायदा कलम १४ अन्वये महिलांना एखादी मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्युपत्र, बक्षीसपत्र किंवा खरेदीने, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अशा मिळकतींची संपूर्ण मालक होते. फक्त, ज्या मिळकतींमध्ये तहहयात राहण्याचा हक्क दिला असेल त्या मिळकतीचा अपवाद सोडून.
निपुत्रिक महिला आणि मिळकतीचे विभाजन : पुरुष अविवाहित/निपुत्रिक असेल तर मिळकतीच्या विभाजनात विशेष फरक पडत नाही. महिलांच्या बाबतीत मात्र हा फरक पडतो. कलम १५ (१) प्रमाणे एखादी हिंदू महिला मृत्युपत्र न करता मरण पावली तर तिची मिळकत सर्वप्रथम तिचा नवरा, मुलगा-मुलगी, जर मुलगा-मुलगी आधीच मृत झाले असतील तर त्यांची मुले अर्थात नातवंडे यांच्यात समानपणे विभागली जाईल.
यांच्यापैकी कोणीच नसेल तर मग नवऱ्याच्या वारसांकडे, ते नसतील तर आई-वडील, तेही नसतील तर वडिलांच्या वारसांकडे आणि शेवटी आईच्या वारसांकडे ती मिळकत जाईल. 'महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत ही मिळकतीच्या उगमाकडेच जाईल' ही कलम १५ (२) मधील पूर्वअट लक्षात घ्यावीच लागते.
जर महिलेला एखादी मिळकत तिचे वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला निपुत्रिक असेल, म्हणजे तिचे मुलगा-मुलगी आधीच मृत झाले असतील तर त्यांची मुले म्हणजे नातवंडे यांपैकी कोणी वारस हयात नसतील तर अशी मिळकत ही कलम १५ (१) प्रमाणे न जाता केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसांकडेच जाईल.
जर का मिळकत नवऱ्याकडून किंवा सासऱ्यांकडून आली असेल आणि निपुत्रिक असेल तर ती मिळकत तिच्या मृत्युनंतर तिच्या नवऱ्याच्या वारसांकडे जाते. याचा अर्थ अविवाहित स्त्री-पुरुष दोघांनीही मृत्युपत्र केले नाही तर नक्की कुणाला किंवा एखाद्या संस्थेला मिळकत देण्याच्या सर्व संधी आणि शक्यता नाहीशा होतात, हे लक्षात घ्यावे.
यावरून काय धडा घ्यावा?
अविवाहित स्त्री-पुरुषांनी वेळीच रीतसर नोंदणीकृत मृत्युपत्र करणे सोयीचे!
मृत्युपत्राचा लाभार्थीच आपल्या आधी गेला तर मिळकत कुणाला जाणार हा 'प्लॅन बी' प्रत्येकाने मृत्युपत्रात लिहून ठेवावा.
तुम्ही विवाहित असा किंवा नसा, मृत्युपत्र करून ठेवणे हा सर्वांत उपयुक्त मार्ग आहे.
- अॅड. रोहित एरंडे
rohiterande24@gmail.com
