Oil Seeds : गेल्या काही वर्षांत नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, हरभरा, कांदा व भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पाहायला मिळत असून, याचा थेट परिणाम पारंपरिक तेलबिया पिकांवर झाला आहे. (Oil Seeds)
सूर्यफूल, जवस, करडई, भुईमूग यांसारखी रब्बी हंगामातील तेलबिया पिके अडगाव खुर्द परिसरात जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चिंताजनक चित्र सध्या दिसून येत आहे.(Oil Seeds)
खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा, मका, कांदा तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड करत आहेत. मात्र, तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांनी पूर्णतः पाठ फिरवल्याचे वास्तव समोर आले आहे. (Oil Seeds)
सध्या अनेक गावांमध्ये सूर्यफूल, जवस, करडई व भुईमूग पिकांची पेरणी शून्यावर आली आहे.
खर्च वाढला, उत्पन्न घटले
तेलबिया पिकांसाठी मशागत, दर्जेदार बियाणे, खते, फवारणी, पेरणी व काढणीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अनिश्चित वीजपुरवठा आणि पाण्याची टंचाई यामुळे या पिकांना आवश्यक तेवढे पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी, अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाला आहे.
रब्बी हंगामात गहू-हरभऱ्यालाच प्राधान्य
सध्याच्या परिस्थितीत तुलनेने कमी जोखीम, बाजारात स्थिर मागणी आणि हमीभावाची शक्यता लक्षात घेता शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा व मका पिकांना प्राधान्य देत आहेत. तसेच, भाजीपाला पिकांमधून अल्प कालावधीत नगदी उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकरी या पिकांकडे वळले आहेत.
तेल घाणेही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर
पूर्वी अडगाव खुर्द परिसरात तीळ, सूर्यफूल, जवस, करडई व भुईमूगाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात होते.
यामुळे तालुक्यात पारंपरिक तेल घाणे कार्यरत होते. या घाण्यांमधून तयार होणारी पेंड जनावरांसाठी पोषणमूल्य असलेला महत्त्वाचा चारा ठरत होती. मात्र, तेलबिया पिकांचे क्षेत्र घटल्याने तेल घाणेही हळूहळू बंद पडत असून, हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मोठा फटका मानला जात आहे.
शेतकऱ्यांचा अनुभव
पूर्वीसारखे मुबलक पाणी आता उपलब्ध नाही. सूर्यफुलासह तेलबिया पिकांना भरपूर पाणी लागते. लागवड खर्च अधिक असूनही बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे तेलबियांची लागवड टाळली. - गोपाल रंदे, शेतकरी, अडगाव खुर्द
तेलबिया पिकांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नाही. भावही समाधानकारक मिळत नाही. शिवाय पशू-पक्षी व वन्य प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकांचीच पेरणी केली. - अजाबराव गवई, शेतकरी, अडगाव खुर्द
धोरणात्मक उपायांची गरज
तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवायचे असल्यास शासनाने या पिकांना किमान हमीभाव, उत्पादन खर्चावर आधारित प्रोत्साहन, सिंचन सुविधा व संरक्षणात्मक उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. अन्यथा, येत्या काही वर्षांत तेलबिया पिके केवळ इतिहासातच उरतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
