Join us

35 हजार शेतकरी बाधित, सर्वाधिक कांद्याचे नुकसान, नाशिकला किती नुकसान भरपाई मिळणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:32 IST

Nashik Crop Damage : मे महिन्यात जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसाने (Avkali Paus) जिल्ह्यातील १,४६९ गावांना फटका बसला आहे.

नाशिक : मे महिन्यात जोरदार बरसलेल्या अवकाळी पावसाने (Avkali Paus) जिल्ह्यातील १,४६९ गावांमधील ३५,७५७ शेतकऱ्यांचे १२,१५६ हेक्टरवरील पिके जमीनदोस्त केल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. या बाधित पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी ३५ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांची भरपाई (Nuksan Bharpai) द्यावी लागणार असल्याचा अंदाज प्राथमिक पंचनाम्यानंतर नमूद करण्यात आला आहे.

कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला  (Krushi Department) सादर केलेल्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. दि. ५ मेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले होते. जवळपास वीस दिवस पाऊस बरसत होता. यात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. विशेषतः कांदा, द्राक्ष, आंबा यासारख्या नगदी पिकांना Onion Crop Damage) फटका बसला.

पावसामुळे पंचनामे करायलाही विलंब होत होता. अखेर कृषी विभागाने पंचनामे करून अंतिम अहवाल सादर केला आहे. त्यानुसार ७,५५७ हेक्टरवरील कांद्याचे, ३९४ हेक्टरवरील मका या पिकांसह टोमॅटो-३१९, बाजरी -१४८, भुईमूग-११८, भाजीपाला-९३३ हेक्टर याप्रमाणे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच २,४४२ हेक्टरवरील आंबा अवकाळीच्या तडाख्यात सापडला असून, मोठ्चा प्रमाणात नुकसान झाले आहे. १९१ हेक्टरवरील डाळिंबालाही त्याचा फटका बसला आहे.

कुठे किती नुकसान ९५७ गावांमधील २१,०८४ शेतकऱ्यांचे ९,४९४ हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी २५ कोटी ६३ लाख ४७ हजार रुपयांच्या तरतुदीची सूचना करण्यात आली आहे. तसेच ५१२ गावांमधील १४,६७३ शेतकऱ्यांचे २,६६२ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ९ कोटी ५८ लाख रूपयांची आवश्यकता आहे. १,४६९ गावांमधील ३५,७५७ शेतकऱ्यांचे बागायती आणि फळपिकांचे १२,१५६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचे पंचनामेही करण्यात आले आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रनाशिकपीक विमापाऊसकांदा