जळगाव : गेल्यावर्षी अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे पिकांसह शेतीच्या नुकसानीपोटी ३ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना 'रब्बी' हंगाम फुलविता यावा, यादृष्टीने राज्य शासनाने ३ हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार राज्य शासनाने २७० कोटी ९२ लाख ६४ हजार ७०० रुपयांचे अनुदान उपलब्ध केले असताना, २ लाख ७१ हजार २७ शेतकऱ्यांना १८७ कोटी ४३ लाख ८ हजार ७४३ रुपयांचे अनुदान संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या 'रब्बी'च्या स्वप्नपूर्तीसाठी 'बूस्टर' मिळाले आहे.
गेल्यावर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतातील उभे पीक वाहून गेल्याने आणि शेतजमीन खरडून निघाल्याने 'रब्बी' हंगामदेखील अडचणीत सापडला होता. आर्थिककोंडीत सापडलेल्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १० हजारांची मदत देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता.
'रब्बी' हंगामासाठी नुकसानग्रस्तांना आर्थिक दिलासा मिळावा, यादृष्टीने राज्य शासनाने जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ४८७ शेतकऱ्यांसाठी २७० कोटी ९२ लाख ६४ हजारांवर अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार १५ जानेवारीअखेरीस २ लाख ७१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची ही रक्कम वर्ग झाली आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाल्याने यंदाचा रब्बी हंगाम नव्या उमेदीने बहरला आहे.
