NAFED Soybean Kharedi : शासनाने सोयाबीन खरेदीसाठी 'नाफेड'मार्फत नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून प्रत्यक्ष खरेदी साधारणपणे १३ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. (NAFED Soybean Kharedi)
मात्र, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३० टक्के शेतकऱ्यांचीच सोयाबीन खरेदी झाल्याचे चित्र आहे. परिणामी, तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांची खरेदी अद्याप बाकी असल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली आहे.(NAFED Soybean Kharedi)
यावर्षी अमरावती जिल्ह्यात 'नाफेड'च्या १६ केंद्रांवर सोयाबीन खरेदी सुरू आहे. ३० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १४ हजार २०१ शेतकऱ्यांची खरेदीपूर्व नोंदणी झाली आहे. (NAFED Soybean Kharedi)
यामध्ये जिल्हा विपणन अधिकारी (DMO) अंतर्गत ८ हजार १९१ तर विदर्भ सहकारी विपणन महासंघ (VCMF) अंतर्गत ६ हजार १० शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे.(NAFED Soybean Kharedi)
खरेदी मात्र केवळ ३०.५४ टक्के
नोंदणीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ हजार ३३७ शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी झाली आहे. यामध्ये डीएमओअंतर्गत २ हजार ५१३ तर VCMF व्हीसीएमएफअंतर्गत १ हजार ८२४ शेतकऱ्यांची खरेदी झाली असून एकूण खरेदीची टक्केवारी केवळ ३०.५४ टक्के इतकी आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.
खासगी बाजारात दर कमी, मात्र नगदी चुकारे
शासनाने यंदा सोयाबीनसाठी ५ हजार ३१८ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, खासगी बाजारात अद्यापही हा दर मिळत नाही.
सोमवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ४ हजार ३०० ते ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
हमीभावापेक्षा सुमारे हजार रुपयांनी कमी दर असला तरी खासगी व्यापाऱ्यांकडून नगदी चुकारे मिळत असल्याने अनेक शेतकरी खासगी खरेदीकडे वळताना दिसत आहेत. याउलट, 'नाफेड'मध्ये एफएक्यू प्रतवारी, वजन मर्यादा आणि पेमेंटसाठी प्रतीक्षा यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह कमी होत आहे.
'नाफेड' केंद्रांवर खरेदीचा वेग कधी वाढणार?
अमरावती बाजार समितीत हंगामात एका दिवसात २० ते २२ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी होते. मात्र, त्याच्या तुलनेत 'नाफेड'च्या केंद्रांवर दररोज केवळ शंभराच्या आसपास शेतकऱ्यांची आणि साधारण दीड हजार क्विंटल सोयाबीनचीच खरेदी केली जात आहे. ही तफावत मोठी असून मुळात केंद्रांवरील खरेदीचा वेग अत्यंत मंद असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी
नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची वेळेत खरेदी व्हावी, केंद्रांवरील प्रक्रिया सुलभ करावी तसेच खरेदीचा वेग वाढवावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. अन्यथा हमीभावाचा उद्देशच फोल ठरेल, अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
