- किशोर मराठे
मोह फुले वेचणीचा मुख्य हंगाम मार्च ते एप्रिल (होळीनंतर) या उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात असतो. झाडावरून पिवळी मोह फुले रात्री उमलून पहाटे जमिनीवर सडयासारखी पडतात. जी आदिवासी बांधवांद्वारे गोळा केली जातात. अनेकदा झाडाभोवती पडल्याने असंख्य मोहफुलांचे नुकसान होते. यासाठी सातपुड्यातील शेतकऱ्यांनी जुगाड केले आहे.
सद्यस्थितीत उन्हाचे दिवस झाले असून अनेक भागात मोहफुलांना बहर येण्यास सुरवात झाली आहे. अशावेळी मोहाचे झाड ज्या शेतकऱ्याच्या मालकी जागेत असे शेतकरी त्याची राखणी करत असतात. मोहफुले हंगाम साधारणपणे १०-१५ दिवस चालतो. या काळात ग्रामीण व आदिवासी भागात फुले वेचण्याची लगबग पाहायला मिळते. काही ठिकाणी मोहाच्या झाडांना गोलाकार दगडी बांधाचा आधार दिला जातो.
सातपुड्याच्या गाव पाड्यावर वर्षातील प्रत्येक हंगामात सीताफळ, आमचूर, महू, हिरडा यापासुन चांगली आर्थिक मदत मिळते. परंतु बदलत्या हवामानामुळे व जमिनीची धूप झाल्याने या वनोपजांचा उत्पादनावर परिणाम होतो आहे. सातपुड्यातील मोलगी परिसर सेवा समिती व रीड्स भारत यांनी परिसरातील अभ्यासू व प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून परिसराचे अध्ययन करण्यात आले. परिसरातील मोहफुलांच्या झाडांचे सक्षमीकरण केले जात आहे. यासाठी झाडांना दगडी बांधाचा आधार, महू संकलनासाठी जाळीची मदत, केली जात आहे.
तीनशे झाडांना जाळीचा आधार
सातपुड्यातील मोहाच्या झाडांना फुले येण्यास सुरवात झाली आहे. या मोहू फुलांची राखण करणे, मोह वेचण्यासाठी लागणारा जास्तीचा वेळ या जाळीने कमी होणार आहे. शिवाय मोह फुलांचा दर्जा चांगला राहणार आहे. तसेच मोह झाडांची संख्या वाढवण्यासाठी बालाघाट व भगदरी या गावात रोपवाटिका निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान बालाघाट, मालपाडा, जुनवानी , डोंगरफडी, वनवाईपाडा या पाच गावात तीनशे झाडांना आधार दिला जाणार आहे. जिथे फुले गळून पडत आहेत, तिथे जाळी लावण्यात आली आहे
