नाशिक : सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून, शहरासह ग्रामीण भागातील महिला विविध प्रकारचे घरगुती उन्हाळी साहित्य तयार करण्याच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. त्यात लाल तिखट, पापड, लोणचे, शेवया या साहित्याचा समावेश आहे. त्यातच तिखटाला सर्वाधिक पसंती असते.
गतवर्षीपेक्षा चालूवर्षी मिरचीचे दर चांगलेच कडाडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सध्या मिरचीची आवक कमी, दर दुपटीने वाढल्याने गतवर्षाच्या तुलनेत तिखट तयार करायला लागणारी मिरची महागली आहे.
गेल्यावर्षी मिरचीचे दर ३५० ते ४०० रुपये किलो होते. चालूवर्षी त्यात ७० ते ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील मिरचीची आवक होत आहे.
मिरचीचे दर (किलोप्रमाणे)
- गुंटूर मिरची - मागील दर २३० ते २५० रुपये, सध्याचे दर १६० ते १८० रुपये
- संकेश्वरी - मागील दर २७० ते ३०० रुपये, सध्याचे दर १५० ते १७० रुपये
- लवंगी - मागील दर २५० ते २८० रुपये, सध्याचे दर १८० ते २०० रुपये
- बेडगी - मागील दर ३८० ते ४२० रुपये, सध्याचे दर २०० ते २४० रुपये
मसाल्याच्या दरातही गतवर्षापेक्षा २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे... ते असे आहेत.
- जिरे - मागील दर २६० ते २८० रुपये, सध्याचे दर ३४० ते ३८० रुपये
- खोबरे - मागील दर २०० ते २५० रुपये, सध्याचे दर ३८० ते ४०० रुपये
- धणे - मागील दर १२० ते १३० रुपये, सध्याचे दर १५० ते १६० रुपये
- तीळ - मागील दर १४० ते १५० रुपये, सध्याचे दर १६० ते १७० रुपये
बाजारात जानेवारी महिन्यापासूनच नवीन मिरचीची आवक होते. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने त्यातच मिरचीचे दर गतवर्षापेक्षा दुपटीने व मसाल्याचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांत नाराजी आहे.
- संतोष कमानकर, किराणा दुकानदार, भेंडाळी
