E Pik Pahani : रब्बी हंगामातील पिकांची अधिकृत नोंद व्हावी, यासाठी शासनामार्फत ई-पीक पाहणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत पिकांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
मुदतीत नोंदणी न केल्यास सातबाऱ्यावर पिकाचा रकाना कोरा राहणार आहे. त्यामुळे भविष्यात पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
महसूल विभागाने ई-पीक पाहणी ४.०.५ हे नवीन मोबाइल अँप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन, शेताच्या बांधावरूनच या अँपद्वारे पिकाची माहिती अपलोड करायची आहे. यामुळे सातबाऱ्यावर अचूक नोंद होऊन प्रक्रियेत पारदर्शकता येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
शासनाकडून मदतीचा हात
ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही किंवा अँप वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तलाठी, कोतवाल किंवा गावात नियुक्त केलेले मदतनीस यांच्यामार्फत शेतकरी पिकांची नोंदणी करून घेऊ शकतात.
नोंदणी का आवश्यक ?
अवेळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मदत मिळवण्यासाठी पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे. नोंदणी न केल्यास सातबारा कोरा राहतो आणि लाभ घेताना अडचणी निर्माण होतात.
