विजय सरवदे
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येत असलेल्या 'उमेद' (Umed) ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. (Lakhpati Didi Scheme)
बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबनाकडे वाटचाल करणाऱ्या तब्बल ७० हजार महिलांनी गेल्या वर्षात 'लखपती दीदी' हा सन्मान मिळवला आहे. महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांच्या पुढे नेले आणि स्वावलंबनाचे नवे उदाहरण निर्माण केले.(Lakhpati Didi Scheme)
याच पायावर पुढे सरसावत, येत्या मार्चअखेरपर्यंत आणखी ६९ हजार महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे लक्ष उमेद अभियानाने निर्धारीत केले आहे.(Lakhpati Didi Scheme)
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासनाने विशेष पुढाकार घेतला आहे. 'लखपती दीदी' हा उपक्रम फक्त आर्थिक उत्पन्न वाढविण्यापुरता मर्यादित नसून, महिलांच्या प्रतिष्ठा, निर्णयक्षमता आणि सक्षमीकरणाचा आधारस्तंभ असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
उमेद अभियान – जिल्ह्यातील बचत गटांचे मोठे जाळे
सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात किती गट
१८,९०० बचत गट सक्रिय
यामध्ये २ लाखांहून अधिक महिला सहभागी
चालू वर्षात ६३८ नवीन बचत गटांची स्थापना
महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी उमेदकडून १५ हजार तसेच शासनाकडून १५ हजार असे ३० हजार रुपये खेळते भांडवल मिळते.
तथापि, या वर्षी स्थापन झालेल्या ७३८ गटांना उमेदकडून १५ हजारांच्या प्रमाणात १ कोटी १५ लाख २० हजार रुपये वितरीत करण्यात आले असून राज्य शासनाचा हिस्सा अद्याप प्राप्त झालेला नाही.
व्यवसाय विस्तारासाठी मोठी आर्थिक मदत
उद्योजकतेला चालना देण्यासाठी या वर्षात:
१,३०१ बचत गटांना
सामुदायिक गुंतवणूक निधी (CIF) अंतर्गत
तब्बल ७ कोटी ८० लाख ६० हजार रुपये मंजूर
ही मदत नवीन व्यवसाय सुरू करणे, विद्यमान व्यवसायाचा विस्तार, तसेच बाजारपेठ मिळविण्यासाठी मोलाची ठरत आहे.
महिला कोणते व्यवसाय करत आहेत?
उमेद बचत गटांनी ग्रामीण स्तरावर विविध व्यवसाय उभे केले आहेत.
कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, पशुखाद्य उत्पादन, डाळमिल, डाळबट्टी/आटा प्रक्रिया, तेलघाणी,मसाले पापड, लोणची तयार करणे
सौरऊर्जेवर कांदा वाळवणी, शिलाई मशीन व विणकाम, ब्युटी पार्लर, ज्यूट बॅग निर्मिती या उत्पादनांपैकी २२ प्रमुख उत्पादने 'उमेद मार्ट'वर ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी दिली.
६९ हजार कुटुंबांची ओळख निश्चित
एप्रिल ते १५ नोव्हेंबर या कालावधीत ६९,०९१ महिलांची / कुटुंबांची आर्थिक प्रगती तपासण्यात आली
त्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे निश्चित
त्यामुळे ही कुटुंबे 'लखपती दीदी' श्रेणीत समाविष्ट होणार
ग्रामीण महिलांचे हे आर्थिक पुनरुज्जीवन जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरले आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाला नवे पंख
* उमेद अभियानामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळते.
* घरातील जबाबदाऱ्या आणि व्यवसाय दोन्ही हाताळण्याची क्षमता वाढली
* घरगुती उद्योगांना ग्रामीण बाजारपेठेसह ऑनलाइन बाजारही उपलब्ध
* उद्योजकतेमुळे महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढले
'उमेद'च्या माध्यमातून हजारो महिलांमध्ये निर्माण झालेली स्वावलंबनाची चळवळ ही ग्रामीण भागासाठी दिशादर्शक ठरत आहे. येत्या काही महिन्यांत आणखी ६९ हजार महिला 'लखपती दीदी' म्हणून घडवण्याचा विश्वास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
