- सुनील लोहार
जळगाव : पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड, भोजे, पिंपळगाव हरे. कळमसरा व लोहारा ही गावे भाजीपाला उत्पादनासाठी ओळखली जातात. त्यामध्ये कुऱ्हाड खुर्द गावाने वांगी उत्पादनात ओळख निर्माण केली असून, येथील ताजी व दर्जेदार वांगी थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचत आहेत.
गावातील सुमारे ७० टक्के शेतकरी आपल्या शेतात विविध जातींच्या वांग्याची लागवड करतात. त्रिवेणी, निर्मल, पंचगंगा, काटेरी, सफेद वांगे तसेच भरीत वांगे या जातींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
कुऱ्हाड गावातील शेतकरी आधुनिक शेतीपद्धती, ठिबक सिंचन व योग्य खत व्यवस्थापनाचा वापर करून दर्जेदार उत्पादन घेत आहेत. येथून दररोज मोठ्या प्रमाणावर वांगी मुंबई, वाशी, नाशिक, पुणे, भुसावळ आणि जळगाव या बाजारपेठांकडे रवाना होतात.
मुंबईतून मागणी वाढल्याने बाजारपेठ मिळाली
विशेष म्हणजे मुंबईतील व्यापाऱ्यांकडून कुन्हाडच्या वांग्याला चांगली मागणी असल्याने हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. गुणवत्तेमुळे स्थिर ग्राहकवर्ग तयार झाला आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना बाजारपेठेची खात्री मिळत आहे.
वांगी उत्पादनाचे केंद्र
हवामानातील बदल, अतिवृष्टी किंवा बाजारातील चढ-उतार यांसारख्या अडचणींना सामोरे जात असतानाही कुन्हाडचे शेतकरी जिद्दीने शेती करत आहेत. गेल्या काही वर्षात वांगी उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली असून, गावाची ओळख 'वांगी उत्पादनाचे केंद्र' अशी निर्माण होत आहे. कुऱ्हाड गावातील वांगी थेट मुंबईच्या बाजारात पोहोचत असल्याने गावाच्या नावाला व्यापारी क्षेत्रात नवी ओळख मिळाली असून, स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीचे हे यश मानले जात आहे.
मागील वर्षी एका बिघ्यात सुमारे अकरा लाख रुपयांचे वांग्याचे उत्पादन झाले होते. यंदा अतिपावसामुळे फुलगळ होऊन उत्पादनात जवळपास निम्म्याने घट आली.
- समाधान चौधरी, वांगी उत्पादक, कुन्हाड
