Kisan Call Center : शेतकऱ्यांना शेतीविषयक समस्या, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती थेट व सुलभ पद्धतीने मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत 'किसान कॉल सेंटर' ही महत्त्वाची योजना राबवली जात आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती तसेच शेतीपूरक व्यवसायाशी संबंधित मार्गदर्शनासाठी १८००-१८०-१५५१ या टोल-फ्री क्रमांकाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे.
शेती करताना शेतकऱ्यांच्या कामात पीक लागवड, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, हवामान बदल, बाजारभाव, पशुसंवर्धन आदी अनेक शंका निर्माण होतात. या शंकांचे निराकरण शेतकऱ्यांच्या स्वतःच्या भाषेत आणि तज्ज्ञांकडून व्हावे, या उद्देशाने २१ जानेवारी २००४ पासून 'किसान कॉल सेंटर' सेवा सुरू करण्यात आली आहे.
सध्या इफ्को किसान संचार लिमिटेडद्वारे या सेवेचे व्यवस्थापन करण्यात येत असून, देशभरात ३८२ प्रशिक्षित कृषी सल्लागार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्रासाठी या सेवेचे मुख्य कार्यालय पुणे येथे कार्यरत आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
टोल-फ्री क्रमांक : १८००-१८०-१५५१ (पूर्णतः मोफत)
सेवेची वेळ : आठवड्यातील सातही दिवस, सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत
भाषा : देशातील २२ स्थानिक भाषांमध्ये सेवा उपलब्ध; महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत संवाद
डिजिटल सुविधा : 'किसान ज्ञान व्यवस्थापन प्रणाली'अंतर्गत एसएमएस अलर्ट, कॉल रेकॉर्डिंग आणि dackkms.gov.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध
कोणती माहिती मिळणार?
किसान कॉल सेंटरवरून शेतकऱ्यांना केवळ पारंपरिक शेतीपुरतीच नव्हे, तर शेती व शेतीपूरक विविध क्षेत्रांतील अद्ययावत माहिती मिळू शकते.
यात फळबाग लागवड, जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, रेशीम उद्योग, कृषी अभियांत्रिकी, कृषी विपणन, गृहविज्ञान तसेच जलसंधारण व जलव्यवस्थापन यांचा समावेश आहे.
तसेच विविध शासकीय योजना, अनुदान, नवीन तंत्रज्ञान आणि उत्पन्नवाढीच्या संधींबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या टोल-फ्री क्रमांकाचा आणि संकेतस्थळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
