Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात पीक पद्धतीत मोठा बदल होताना दिसत आहे. पारंपरिक सोयाबीन पिकाकडून हळद लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यंदा हळदीचे (Turmeric) क्षेत्र तब्बल १५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (Kharif Season)
गेल्या रब्बी हंगामात 'चिया' पिकाच्या (Chia Crop) यशस्वी प्रयोगामुळे नवे पर्याय स्वीकारण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये वाढला आहे. त्यामुळे आता शाश्वत उत्पन्न देणाऱ्या, जमिनीचा कस टिकवणाऱ्या आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणाऱ्या हळदीकडे (Turmeric) शेतकऱ्यांचा कल झुकत आहे. (Kharif Season)
येत्या खरीप हंगामासाठी मालेगाव तालुक्यात कृषी विभागाने तयारी पूर्ण केली असून, यंदा पीक पद्धतीत लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेषतः हळद लागवडीचे क्षेत्र यंदा सुमारे १५ टक्क्यांनी वाढेल, तर पारंपरिक पीक असलेल्या सोयाबीनच्या पेरणीमध्ये काही प्रमाणात घट होण्याचा अंदाज तालुका कृषी विभागाने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल
* रब्बी हंगामात यशस्वी ठरलेला 'चिया' पिकाचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यामुळे पारंपरिक सोयाबीनच्या ऐवजी यंदा शेतकरी हळदसारख्या नगदी पिकांकडे वळताना दिसत आहेत.
* शिवाय हळद हे निर्यातक्षम आणि बाजारभाव देणारे पीक असल्याने त्यामध्ये अधिक फायदा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे वाढत आहे.
सोयाबीन पेरणीत घट; आंतरपीक पद्धतीला प्राधान्य
* तालुक्यात यंदा सुमारे ४९ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड, २ हजार ५५० हेक्टरवर हळद, तर ५५० हेक्टरवर कपाशी लागवडीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
* यंदा तुरीसोबत सोयाबीनची आंतरपीक पद्धत प्रचलित होत असून, यामुळे जमिनीचा कस टिकतो आणि शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्न मिळते.
बीबीएफ पद्धतीने वाढणार उत्पादनक्षमता
ब्रॉड बेड फरो (BBF) पद्धतीने पेरणी करण्यासाठी कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. या पद्धतीमुळे जमिनीत ओलावा टिकतो, मुळांना पुरेसा हवा व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो आणि पीक उत्पादनात वाढ होते. यंदा या पद्धतीचा अवलंब सुमारे १५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.
बीज उगवण क्षमता चाचण्या सुरू
गावोगावी शेतकऱ्यांसाठी बीज उगवण चाचण्यांची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्यामुळे शेतकरी गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा वापर करत असून, पेरणीपूर्व तयारी योग्य प्रकारे करत असल्याचे चित्र आहे.
हवामान अनुकूल राहिल्यास बंपर उत्पादन शक्य
तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर यांनी सांगितले की, वेळेवर मान्सून दाखल झाल्यास आणि हवामानाची साथ लाभल्यास यंदाच्या खरीप हंगामात हळद व सोयाबीन या प्रमुख पिकांचे उत्पादन समाधानकारक होण्याची शक्यता आहे. यासाठी कृषी विभाग सज्ज असून, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chia Pik: जाणून घेऊयात चियाचे लागवड तंत्र आहे तरी काय?