Kharif Season : खरीप पेरण्यांचा हंगाम तोंडावर येऊनही अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यांसह डीएपी खताच्या कमतरतेचा मोठा सामना करावा लागत आहे. मागणीपेक्षा खूपच कमी पुरवठा झाल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. (Kharif Season)
वेळेवर साठा उपलब्ध न झाल्यास, पेरण्यांमध्ये उशीर होऊन उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामाच्या पेरण्यांचा मुहूर्त जवळ आला असताना, जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशी बियाण्यांच्या आणि 'डीएपी' खताच्या साठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या तयारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. (Kharif Season)
बियाणे आणि खतांच्या अपुऱ्या साठ्यामुळे खरीप हंगामाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. शासन आणि खत उत्पादक कंपन्यांनी वेळीच पूर्तता न केल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आगामी हंगामातील उत्पादन, बाजारातील दर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यावरही परिणाम होऊ शकतो.(Kharif Season)
बियाणे आणि खत साठ्याची सद्यस्थिती
कपाशी बियाण्यांची मागणी : ३ लाख पाकिटांची
उपलब्धता (७ जूनपर्यंत) : फक्त १,१२,००० पाकिटे
सद्यस्थितीत उपलब्ध : केवळ १ हजार पाकिटे
बियाण्यांचा साठा केव्हा मिळणार याची माहिती अद्याप स्पष्ट नाही. मागणीप्रमाणे साठा होईपर्यंत पेरण्यांचा मुहूर्त पुढे ढकलावा लागेल का? अशी स्थानिक शेतकऱ्यांना चिंता पडली आहे.
'डीएपी' खत पुरवठ्याची स्थिती
मागणी : २५ हजार मेट्रिक टन
उपलब्धता (सध्याची) : ४ हजार मेट्रिक टन
सद्यस्थितीतील थेट साठा : फक्त १ हजार ३०० मेट्रिक टन
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार?
* पेरण्या उशिरा होण्याचा धोका
* कपाशी उत्पादनावर परिणाम
* काळ्या बाजाराचा संभाव्य धोका
* कमी उत्पादनामुळे आर्थिक फटका
जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असलेले कपाशीचे बियाणे आणि डीएपी खताचा मागणीप्रमाणे पुरवठा व्हावा, यासाठी कृषी आयुक्तालयासह संबंधित कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. - डॉ. तुषार जाधव, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.