Kharif Season : मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांमध्ये दिलासा दिला असून, लातूर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्टर्सवर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. घरगुती बियाण्यांची मुबलक उपलब्धता आणि खत साठवणीच्या तयारीमुळे खरीप हंगामासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. (Kharif Season)
यंदाच्या खरीप हंगामात लातूर जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असून, अंदाजे ४ लाख २८ हजार १२२ हेक्टर्स क्षेत्रावर पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. (Kharif Season)
यावर्षी मान्सूनपूर्व व मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, या वर्षीच्या अपेक्षित पेरणीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ५० ते ६० हजार हेक्टर्सनी घट होण्याचा अंदाजही आहे.(Kharif Season)
गेल्यावर्षी जिल्ह्यात ४ लाख ९९ हजार १३६ हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यंदा पेरणीसाठी घरगुती बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.
सध्या शेतकऱ्यांकडे ४ लाख ५३ हजार ६८४ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता असून, यामुळे बियाण्यांच्या तुटवड्याची शक्यता कमी झाली आहे.
कृषी विभागानेही बियाण्यांची स्वतंत्र तयारी केली असून, विभागातर्फे ५२ हजार ५५८ क्विंटल, तर खाजगी कंपन्यांकडून ७४ हजार १५१ क्विंटल असे मिळून एकूण १ लाख २६ हजार ७०९ क्विंटल बियाण्यांचा साठा करण्यात आला आहे.
मान्सून आणि पेरणीची स्थिती
मे महिन्यात जिल्ह्यात २३६.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जून महिन्यात आतापर्यंत केवळ ४९.१ मि.मी. पाऊस झालेला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये अद्याप वापसा झालेला नाही.
८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणीसाठी योग्य वेळ ठरेल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. हवामान विभागाने १३, १४ व १५ जून या तीन दिवसांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित पिकांचे क्षेत्र
तूर : ७३,८२० हेक्टर्स
मूग : ७,२४५ हेक्टर्स
उडीद : ५,८६४ हेक्टर्स
खरीप ज्वारी : ३,९०० हेक्टर्स
बाजरी : २१५ हेक्टर्स
सूर्यफूल : १६ हेक्टर्स
खतसाठा आणि पुरवठा
खते टंचाई न भासता यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असून, एकूण १ लाख ८९ हजार ७२७ मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. यापैकी १ लाख १९ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. एप्रिल २०२५ अखेर ८ हजार ५१४ मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, यावर्षीच्या खरीप हंगामासाठी २४ हजार ६२१ मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे.
३ दिवस पावसाचे
पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १३, १४, १५ जून असे सलग तीन दिवस पाऊस जिल्ह्यात बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सूनपूर्व पावसाची शेतात पुरेशी ओल...
८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर कृषी विभागाकडून पेरते होण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस २३६.९ मि.मी. झाला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून हा पाऊस आहे.
जून महिन्याच्या प्रारंभी चार-पाच दिवस उघाड होती. पुन्हा मृग नक्षत्रापासून पाऊस सुरू झालेला आहे. परंतु, जून महिन्यात फक्त ४९.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तरीही जिल्ह्यात बहुतांश भागात वापसा नाही. मात्र अद्याप कृषी विभागाने पेरते होण्याचा सल्ला दिलेला नाही.
शेतकऱ्यांनी पेरणी करण्याआधी वाफसा होईपर्यंत थांबावे आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार योग्य वेळ निवडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.