जळगाव : जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे उत्पादनात २५ टक्के घट आली होती, आता अवकाळीमुळे त्यात आणखी १० टक्क्यांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कापूस उत्पादनात ३५ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज कापूस क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
यंदा जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत १ लाख हेक्टरने कमी आहे. वार्षिक १८ लाख गाठींपर्यंत होणारे उत्पादन १४ ते १५ लाख गाठींवर येईल, असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, अतिवृष्टी व आता अवकाळीमुळे जिल्ह्यातील कापसाचे नुकसान झाले असून त्याचा उत्पन्नावर परिणाम होणार आहे. उत्पन्न केवळ ११ ते १२ लाख गाठींवर येण्याची शक्यता आहे. त्यातही, पावसामुळे कापूस काळा पडत असल्याने त्याला हमीभावाइतकाही भाव मिळत नाहीये. त्यामुळे अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणणार नाहीत, परिणामी जिल्ह्यातून केवळ ८ ते ९ लाख गाठींचीच खरेदी होण्याची शक्यता आहे.
सीसीआयची खरेदी अनिश्चित
सप्टेंबरमधील आर्द्रतेमुळे सीसीआयने खरेदीचा १५ ऑक्टोबरचा मुहूर्त २८ ऑक्टोबरपर्यंत आणला, मात्र जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु झाल्यामुळे सीसीआयने या मुहूर्तालाही खरेदी सुरु केली नाही. आता जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या कापसाच्या मालात आर्द्रता राहू शकते, त्यामुळे सीसीआयकडून खरेदी सध्यातरी होण्याची शक्यता कमीच आहे. पुढील खरेदी केव्हा सुरू होईल, याबाबत कोणतीही निश्चिती नसल्याने कापूस उत्पादकांवरील संकट कायम आहे.
जिल्ह्यातील शेतकरीच अडचणीत...
गेल्या काही महिन्यांपासून केळीला भाव नसल्याने, केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल दरात विक्री करावा लागत आहे. सोयाबीन, मका हमीभावापेक्षाही कमी दरात विक्री करावा लागत आहे. आता कापूस उत्पादकांचीही हीच स्थिती आहे. एकूणच जिल्ह्यातील केळी, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.
